Karjat Traffic Relief Pudhari
अहिल्यानगर

Karjat Traffic Relief: कर्जत शहराला ऊस वाहतुकीपासून दिलासा; बायपासची मागणी जोरात

गळीत हंगाम संपताच कोंडी कमी; बेशिस्त पार्किंगवर कारवाईची मागणी वाढली

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: यंदाच्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपताच कर्जत शहरातील नागरिकांनी जणू सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ऊस वाहतुकीसाठी रस्त्यावरून दिवस-रात्र धावणारी डबल ट्रॉलीची ट्रॅक्टर, तसेच अवजड ट्रक बंद झाल्याने शहरातील मुख्य रस्त्यावरील सततची कोंडी कमी झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

साखर कारखाने सुरू असताना कर्जत शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून ऊसाने भरलेली अवजड व लांबलचक वाहने एकापाठोपाठ एक धावत होती. वास्तविक पाहता दोन ट्रॉल्या जोडून त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस भरून घेऊन जाण्यास कायदेशीर परवानगी नसतानाही वाहनचालक सर्रास नियम मोडताना दिसत होते. त्याचा मनस्ताप शाळकरी विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी, व्यापारी, पादचारी यांना रोजच सहन करावा लागत होता.

आठवडे बाजारच्या दिवशी वाहतुकीची स्थिती अक्षरशः ठप्प होत होती. रस्ता रुंद आणि भव्य असूनही अवजड वाहनांमुळे कोंडी नित्याचीच झाली होती. याचा ताण पोलीस प्रशासनावरही सातत्याने येत होता. आता गळीत हंगाम संपल्यानंतर ही वाहने बंद झाल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली आहे. मात्र, नागरिकांचा हा दिलासा कायमस्वरूपी ठरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बेशिस्त पार्किंगची डोकेदुखी कायम

शहरातील मुख्य रस्त्यावर बेशिस्तपणे उभी राहणारी दुचाकी व चारचाकी वाहने अजूनही वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालयांच्या वेळेत वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. अनेक वाहने रस्त्याच्या मधोमध किंवा वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने उभी केली जात असल्याने कोंडी होत आहे. वाहनचालक स्वंयशिस्त पाळत नसल्याने या बेशिस्त वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता शहरातून जोर धरू लागली आहे.

बायपासशिवाय पर्याय नाही

वाढती लोकसंख्या आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहनसंख्या पाहता कर्जत शहराचा मुख्य रस्ता भविष्यात अपुरा पडणार असल्याचे आता स्पष्ट दिसत आहे. केवळ रस्ता रुंदीकरण करून किंवा पार्किंगचे नियम लावून ही समस्या कायमची सुटणार नाही, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. शहरालगत बायपास काढल्यास अवजड आणि अनावश्यक वाहने शहरात न शिरता बाहेरूनच मार्गक्रमण करतील. त्यामुळे स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांसाठी मुख्य रस्ता मोकळा राहील. यासाठी नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागासह विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी जोरदार मागणी नागरिक व व्यापारी वर्गातून होत आहे.

कारखान्यांमुळे मिळालेला तात्पुरता दिलासा कायमस्वरूपी करायचा असेल, तर वाहतूक शिस्तीची कडक अंमलबजावणी आणि बायपाससारखा दीर्घकालीन उपाय हाच कर्जतच्या भविष्यासाठी एकमेव मार्ग असल्याचे मत आता सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.
गणेश जेवरे, अध्यक्ष मेन रोड संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT