मिरी/पाथर्डी: तालुक्यातील कडगाव येथे शुक्रवारी (दि. ५) रात्री अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे घराची पडझड होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत कुटुंबातील पाच ते सहा जण जखमी झाले असून, घरासह संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कडगाव परिसराला रात्री साडेनऊ ते पावणेदहा वाजण्याच्या सुमारास वादळाचा जोरदार तडाखा बसला. विजाचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विलास शिरसाठ घरातील सर्व सदस्य पडवीत झोपले होते. त्याचवेळी सुसाट वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले. तसेच घड़ाची भिंत कोसळल्याने पडवीत झोपलेल्या कुटुंबीयांवर मातीचा ढिगारा पडला. या घटनेत घरावरील पत्र्याचा जबर मार समाबाई विलास शिरसाट यांना लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेत विलास शिरसाट, सागर शिरसाट, विराज शिरसाट, अलका शिरसाट यांच्यासह अन्य काही कुटुंबीय जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. वादळी वाऱ्यामुळे घराची पूर्ण पडझड झाली असून, अनेक पत्रे वाऱ्याने उडून घरासमोर पडले. घरातील संसारोपयोगी साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे शिरसाट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. पंचनामा व मदतकार्याची प्रक्रिया सुरू असून प्रशासनाने नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान तहसीलदार डॉ.उद्धव नाईक यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
वादळाने केला एका क्षणात घात
परिसरात रात्री वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यातच परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शिरसाट कुटुंबीय पडवीत झोपले होते. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले आणि घराची भिंत कोसळली. पत्र्याचा जबर मार समाबाई शिरसाट यांना लागल्याने त्यांचा जीव गेला. काही क्षणांतच संपूर्ण घराची पडझड होऊन कुटुंबावर मोठे संकट ओढवले.