जामखेड: येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठी सरकारने 31 लाख 96 हजार 5 रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी या महत्त्वपूर्ण कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निर्णयामुळे शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुक्कामाचा व मूलभूत सुविधांचा प्रश्न एकाच ठिकाणी सुटणार आहे.
सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून 27 मार्च 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. नवीन शेतकरी भवन बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून 1 कोटी 27 लाख 84 हजार 17 रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली होती.
या मंजूर रकमेच्या 50 टक्क्यांप्रमाणे 63 लाख 92 हजार 9 रुपये इतके शासन अनुदान या बांधकामासाठी अनुज्ञेय ठरले आहे. या अनुज्ञेय अनुदानाच्या 50 टक्के रक्कम म्हणजेच 31 लाख 96 हजार 5 रुपये पहिला टप्पा म्हणून वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. हा उपलब्ध झालेला निधी वितरित करण्यासाठी पुणे येथील राज्याच्या पणन संचालकांना मान्यता देण्यात आली आहे.
मंजूर करण्यात आलेला पहिल्या टप्प्यातील हा निधी येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आधार संलग्नित बँक खात्यावर पणन संचालनालयामार्फत थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे या भवनाच्या प्रत्यक्ष बांधकामाला आता गती मिळणार आहे.
राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही, तेथे नवीन भवन बांधणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जामखेडमधील हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.