Dharmaveer Gad Pudhari
अहिल्यानगर

Dharmaveer Gad: पेडगावच्या धर्मवीर गडाला अखेर राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा!

३५० वर्षांच्या उपेक्षेला पूर्णविराम; ९३ एकर ऐतिहासिक परिसराचे होणार संवर्धन, २०० कोटींच्या विकास आराखड्याला मिळणार गती

पुढारी वृत्तसेवा

अमोल बी. गव्हाणे

श्रीगोंदा: छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा साक्षीदार असलेल्या पेडगावच्या धर्मवीर गडाला अखेर राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाला आहे. या निर्णयामुळे ३५० वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या ऐतिहासिक ठेव्याच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आ. विक्रम पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे मोठे यश म्हणावे लागेल.

महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० च्या कलम ३ अंतर्गत ही अधिसूचना काढण्यात आली आहे. यानुसार गडावरील एकूण ३ लाख ७७ हजार ३०० चौरस मीटर (सुमारे ९३ एकर) क्षेत्र राज्य संरक्षित म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रामध्ये गडावरील यादवकालीन स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेली रामेश्वर मंदिर, भैरवनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, बाळेश्वर आणि पाताळेश्वर मंदिरे, जुन्या वाड्यांचे अवशेष, हमामखाना, हत्ती मोट आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसर यांचा समावेश आहे. सध्या ही प्राथमिक अधिसूचना असून, दोन महिन्यांत हरकती-सूचना घेऊन अंतिम अधिसूचना काढण्यात येणार आहे.

या गडाचा इतिहास ९व्या ते १४ व्या शतकातील यादव काळापर्यंत जातो. मुळचा भुईकोट असलेल्या या किल्ल्याची १६७२मध्ये औरंगजेबाचा दूधभाऊ बहादूरखान कोकलताश याने डागडुजी केली. त्याला स्वतःचे नाव दिले, तेव्हापासून तो बहादूरगड म्हणून ओळखला जात होता. भीमा नदीच्या काठावर वसलेला हा ११० एकरांतील भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जात होता. फेब्रुवारी १६८९मध्ये संगमेश्वर येथे सरदेसाईंच्या वाड्यात मुघलांनी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना दगाबाजीने पकडल्यानंतर त्यांना याच गडावर आणण्यात आले होते. या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. याच ठिकाणी धर्मासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपतींच्या स्मृती जपण्यासाठी बंडातात्या कराडकर यांनी २००८मध्ये आंदोलन केले होते. त्यानंतर गडाचे नामांतर ‘धर्मवीर गड’ असे केले. शासन दरबारी धर्मवीर गड असे नाव अधिकृत करण्यासाठी आ. विक्रमसिंह पाचपुते यांनीही पाठपुरावा केला होता.

गडावरील ९व्या ते १४व्या शतकातील यादवकालीन मंदिरे, हमामखाना, हत्ती मोट, भीमा नदीतील गुप्त जलवाहिनी ही सर्व वास्तुशास्त्रीय संपदा आता वैज्ञानिक पद्धतीने जतन केली जाईल, ही डागडुजी सिमेंटने नव्हे तर मूळ चुन्या-सुरखीच्या पद्धतीने केली जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गडाच्या तटबंदीचे दगड चोरीला जाणे, आतमध्ये अतिक्रमणे होणे, गायरान जमिनीवर बेकायदा ताबे हे प्रकार सुरू होते. आता कायद्याचे संरक्षण मिळाल्याने पुरातत्त्व विभागाच्या परवानगीशिवाय खोदकाम, बांधकाम, वृक्षतोड करता येणार नाही. उल्लंघन केल्यास कायद्यानुसार कारवाई होणार आहे.

आतापर्यंत पर्यटन विभागाकडून २ कोटी आणि आता जिल्हा नियोजनमधून ५ कोटी असा निधी उपलब्ध झाला आहे. गडास संरक्षित दर्जा प्राप्त झाल्याने पुरातत्त्व विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्पीय निधी मिळेल. गडाच्या संपूर्ण संवर्धन, लायटिंग, रस्ते, संग्रहालय आणि छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी २०० कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्याच्या मंजुरीचा मार्ग सुकर झाला आहे.

अष्टविनायक दर्शनासाठी येणारे लाखो भाविक सिद्धटेक येथे येतात. गडाचा विकास झाल्यानंतर भाविक धर्मवीर गडावर येऊ शकतात. ‘छावा’ चित्रपटानंतर तरुणाईमध्ये संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचा फायदा तालुक्याच्या पर्यटनाला होणार आहे. श्रीगोंदा येथील ‘शिवदुर्ग ट्रेकर्स’ ही संस्था गेल्या काही वर्षांपासून श्रमदानातून गड स्वच्छता आणि संवर्धनाचे काम करत आहे. आता शासनाने संरक्षित दर्जा दिल्याने शासन, संस्था आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या समन्वयातून हा गड महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी स्मारक बनेल.;

धर्मवीर गड आता फक्त श्रीगोंद्याचा नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय झाला आहे. या गडावर आता छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि बलिदान सांगणारे भव्य स्मारक उभे राहणार आहे. हा इतिहासाच्या पुनर्लेखनाचा क्षण आहे. या कामासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचेच हे यश म्हणावे लागेल.
आ. विक्रम पाचपुते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT