नगर: शिर्डीतील भोंदू खरात याच्या काळ्या पैशांतून त्याची स्थावर संपत्ती वाढीसाठी काही एजंट राबत होते, अशी माहिती हळूहळू समोर येत आहे. काकडी, राहाता आणि शिर्डी परिसरातील काही लोक या साखळीत असल्याची चर्चा असून, काहींनी तर खरातसोबत ‘हवाई सफर’ करून ‘सेवा’ केल्याचेही पुढे येत आहे. त्यामुळे भोंदूबाबाची शिर्डीतील संपत्ती कशी वाढली, त्याला कोणी मदत केली, हे सर्व तपासात समोर येणार आहे. दरम्यान, ट्रस्टच्या शिर्डीतील दोघा विश्वस्तांनी खरातचे कारनामे बाहेर येताच आपले राजीनामे दिले, मात्र त्यांना काहीही माहिती नव्हते का, असाही प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे.
भोंदू खरात याचे आजोळ असलेल्या काकडी परिसरात काही एजंटांच्या माध्यमातून कवडीमोल भावात जमीन खरेदी केली गेली आहे. तसेच शिर्डीत काही भक्तही त्याचे विश्वासू होते. त्यांच्या मदतीनेच त्याने काही व्यवहार केले. एवढेच नाही तर त्यात त्याचे ‘ते’ सहकारीही पार्टनर असल्याचे पुढे येत आहे. राहाता परिसरातील एका भक्ताने तर खरातसोबत चार्टर्ड विमानाने हवाई सफर केल्याचेही पुढे येत आहे. त्यामुळे खरात याचे शिर्डीतही खोलवर पाळेमुळे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिर्डीतील खरातचे साम्राज्य उभे करण्यात त्याला कोणी कोणी मदत केली, हवाई सफर कोणी कोणी व का केली, शिर्डीत एजंटांची साखळी कशी होती, कोणत्या हॉटेलमध्ये काळा पैसा गुंतवला होता का, याचा तपासात उलगडा होणार आहे.
अशोक खरात याने श्रीशिवानिका संस्थान ट्रस्टची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करताना, संस्थेच्या घटनेत समाजोपयोगी उपक्रमाला प्राधान्य दिले होते. सीबीएसई पॅटर्न स्कूल सुरू करण्याचाही त्याचा मानस होता. त्याने विश्वस्तांमध्ये जवळच्या आणि विश्वासू लोकांचीच निवड केली होती असे समजते. दरम्यानच्या काळात दोन वर्षांपूर्वीही विश्वस्तांमध्ये अस्वस्थता जाणवू लागली होती. तीन जणांनी आपले राजीनामे दिले होते. त्यानंतर नव्याने रचना करण्यात आली. त्यात त्याने आपल्या पत्नीला सरचिटणीसपद दिले होते, तर उपाध्यक्ष आणि विश्वस्त पदावर शिर्डीतील ‘त्या’ दोघांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, ज्या वेळी खरातचे प्रकरण बाहेर आले, त्यानंतर या दोघांनीही नाशिकच्या धर्मादाय आयुक्तांकडे तत्काळ राजीनामे सुपूर्द केल्याची माहिती समोर आली आहे.
‘त्या’ अपघाताचीही चवीने चर्चा खरातचे शिडीत येणे-जाणे होते. काही वर्षांपूर्वी खरात शिर्डीत आला असता, भक्ताच्या वाहनातून जाताना अपघात झाला होता. त्यात खरातसह तिघे जखमी झाले होते. त्यावेळी अन्य जखमी दोघांकडून खरातनेे ‘तुमचे विघ्न मी अंगावर घेतले’ असे म्हणत लाखोंची ‘दक्षिणा’ घेतल्याची सुरस चर्चा शिर्डीत सुरू आहे. विशेष म्हणजे हे चुलते-पुतणे खरातचे भक्तच होते! दरम्यान, एसआयटीच्या तपासात खरातच्या मोबाईलमधील क्रमांक तपासले जाणार आहेत. त्यासाठीचा डेटाही रिकव्हर करण्यात आला आहे. त्यामुळे आता शिर्डीतीलही कोण कोण भोंदूच्या संपर्कात होते, हे तपासातून उघड होणार आहे.
‘त्या’ जमिनीवर ‘पोहेगाव’च्या संस्थेचे कर्ज
शिर्डीतील चार एकर जमिनीच्या व्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे. यामध्ये साठेखतही तपासले जात आहे. त्यावर असलेल्या स्वाक्षऱ्यांबाबतही खात्री केली जात आहे. साधारणतः या प्रक्रियेला वेळ लागणार असला, तरी यातील सत्यता समोर येणार आहे. याशिवाय, संबंधित संस्थेवर पोहेगाव परिसरातील एका पतसंस्थेचा बोजा होता, ही माहितीही मिळाली आहे. या जमीन व्यवहारात ‘हवाई सफर’ करणारे आणि सोनवणे नामक व्यक्तीचा काही संबंध होता का, हेही तपासातून समोर येणार आहे.