नगर: जिल्ह्यातील आठ तालुक्यांच्या 103 गावांना वादळी वारे आणि अवकाळी पावसाने दणका दिला आहे. या दणक्यात 8091.64 हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरबरा, कांदा, मका, टोमॅटो, शेवगा, कलिंगड, खरबूज, संत्रा, डाळिंब, द्राक्षे, पेरू आदींचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आर्थिक फटका 12 हजार 999 शेतकऱ्यांना बसला आहे. या नुकसानीचा सर्वाधिक फटका श्रीरामपूर आणि पारनेर तालुक्यांना बसला आहे.
बुधवारी (दि.18) झालेल्या पावसात साडेतीन हजार हेक्टरवरील रब्बी पिकांसह भाजीपाला आणि फळबागांना फटका बसला आहे. जवळपास 7 हजार शेतकऱ्यांना या नुकसानीची झळ बसली आहे. गुरुवारी (दि.19) पुन्हा अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या गव्हाला आणि हरभऱ्याला फटका दिला आहे. याशिवाय कलिंगड आणि टरबुजांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
सध्या 60 टक्के रब्बी पिके अद्याप शेतात उभी असून, या पिकांनाही अवकाळी आणि वादळी वाऱ्याचा फटका बसेल का, चिंतेने शेतकऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत. गुरुवारच्या पावसाने पारनेर, पाथर्डी, कर्जत, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, संगमनेर आणि राहाता या आठ तालुक्यांतील 103 गावांतील पिके आणि फळबागांची दाणादाण उडवून दिली. पारनेर तालुक्यात सर्वाधिक फटका बसला आहे.
या तालुक्यातील 3 हजार 209 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, मका, गहू, हरभरा, वाटाणा, टोमॅटो, शेवगा तसेच खरबूज, कलिंगड, संत्रा आदी फळबागांचे नुकसान झाले. श्रीरामपूर तालुक्यातील 32 गावांत 3 हजार 632 हेक्टरवरील पिके जमीनदोस्त केली. या नुकसानीचा आर्थिक फटका 12 हजार 999 शेतकऱ्यांना बसला आहे. एकूण नुकसान झालेल्या 8 हजार 92 हेक्टरपैकी 5 हजार 465 हेक्टरवरील नुकसान हे 33 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या प्राथमिक नुकसानीचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी शासनाला पाठविला आहे.
60 मंडलांत पाऊस
गेल्या 24 तासांत जिल्ह्यात अकरा तालुक्यांतील जवळपास 60 महसूल मंडलांत सरासरी 1.9 मिलिमीटर पाऊस झाला. शेवगाव, पाथर्डी, नेवासा आदी तालुक्यांत सरासरी 5 मिलिमीटरची नोंद झाली. गुरुवारी सकाळी 10 ते शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या कालावधीत अकरा तालुक्यांत पाऊस झाला. शेवगाव तालुक्यात 7.1, पाथर्डी 6, नेवासा 5.7, श्रीरामपूर तालुक्यात 4 मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने रब्बी पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव महसूल मंडलात सरासरी 18.3 मि.मी., कुकाण्यात 16, नांदूर खंदरमाळ मंडलात 13.3 तर सलबतपूर मंडलात 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
नुकसान क्षेत्र व शेतकरी
श्रीरामपूर : 3632 (5411), पारनेर : 3209.1 (5692), राहाता : 611.44 (958), नेवासा : 452 (650), संगमनेर : 125 (180) , शेवगाव : 30 (47), पाथर्डी : 27 (56), कर्जत : 5.1 (5) (क्षेत्र हेक्टरमध्ये)