नगर: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने शनिवारी बारावीचा निकाल जाहीर केला. अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल 90.32 टक्के लागला असून यंदाही मुलीच हुश्शार असल्याची बाब निकालातून समोर आली. दरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविल्यानंतरही गतवर्षापेक्षा यंदा जिल्ह्याचा निकाल 4 टक्क्यांनी वाढला आहे.
राज्य परीक्षा मंडळाने शनिवारी बारावीची निकाल ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. जिल्ह्यात 58892 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यातील 53196 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 90.32 टक्के लागला आहे. 31924 मुलांपैकी 27694 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णचे प्रमाण 86.74 टक्के आहे. 26971 मुलींपैकी 25502 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. मुलींचा निकाल 94.55 टक्के नोंदवला आहे.
यंदाही कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासनाने कंबर कसली होती. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, भास्कर पाटील व इतर यंत्रणेने कॉपीमुक्त अभियान राबवले होते. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा व विशेष पथके तैनात करण्यात आली होती. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसला. परिणामी निकालात घट दिसण्याची शक्यता व्यक्त केले जात होती, मात्र प्रत्यक्षात अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल यंदा गतवर्षापेक्षा 4 टक्क्यांनी वाढला. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल 86 टक्के होता, यंदा तो 90 पार पोहचला.
शनिवारी सकाळपासूनच विद्यार्थ्यांची उत्कंठा व तितकीच मनात धाकधूक देखील वाढली होती. दुपारी बारापासूनच हातात मुलांच्या हातात मोबाईल दिसत होते. क्लिकवर निकाल पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि जल्लोष पाहायला मिळाला. पालकांनी देखील आपल्या पाल्यांना पेढे भरवून आनंदोत्सव केल्याचे दिसले.
जामखेड जिल्ह्यात टॉपर
बारावी निकालात जामखेड तालुका जिल्ह्यात टॉपर ठरला. जामखेड तालुक्याच्या निकालाची टक्केवारी 97.29 इतकी आहे. त्यापाठोपाठ संगमनेर, श्रीगोंदा तालुक्यांचा क्रमांक लागतो. तर शेवगाव तालुक्याचा निकाल सर्वात कमी 83.92 टक्के नोंदवला गेला.
आर्टस्पेक्षा सायन्सचा निकाल जादा
कला शाखेपेक्षा विज्ञान शाखेचा निकाल वाढल्याचे निकालातून दिसले. 38262 विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतून परीक्षा दिली. त्यातील 36943 उत्तीर्ण झाले. 13126 विद्यार्थ्यांनी कला शाखेतून परीक्षा दिली. त्यातील 9923 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाखानिहाय निकाल पाहता आर्टसपेक्षा सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांचे उत्तीर्णचे प्रमाण जादा असल्याचे दिसते.
पुणे विभागात नगर दुसऱ्या क्रमांकावर..
फ्रेश आणि रिपीटेड विद्यार्थ्यांच्या निकालानुसार पुणे विभागात यंदा अहिल्यानगर जिल्हा दुसऱ्या स्थानी झेपावला आहे. पुणे विभागात पुणे जिल्हा 90.98% पहिला आहे. तर अहिल्यानगर जिल्हा 88 % दुसऱ्या स्थानी आणि सोलापूर जिल्हा तिसऱ्या स्थानी फेकला गेला असून त्यांना 84.89% यश मिळाले आहे.