नगर: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेच्या लाटेचा कहर सुरूच आहे. सोमवारी (दि. 27) सकाळपासूनच सूर्य आग ओकत होता. उन्हाच्या कडक झळानी नागरिकांची दिवसभर होरपळ सुरु होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यात सरासरी 41अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
रविवारी (दि.26) तापमानाचा पारा चाळिशीच्या आसपास होता. सोमवारी (दि.27) मात्र, उष्णतेने कहरच केला. सकाळी आठ वाजल्यापासूनच जोरदार चटके बसण्यास प्रारंभ झाला. दुपारी बारानंतर मात्र, उन्हाच्या झळा तीव्र झाल्या. त्यामुळे घराबाहेर पडणे मुश्कील झाले. दुपारी दोन ते तीन वाजेपर्यत जिल्हाभरातील तापमान सरासरी 41 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविले गेले.
या कालावधीत नगर शहरातील रस्ते ओस पडले होते. बाजारपेठा निर्मनुष्य झाल्या होत्या. नेवासा तालुक्यात तापमानाचा पारा 41 तर राहुरी, शेवगाव, श्रीरामपूर, राहाता आदी तालुक्यांतील तापमान 41 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. या उन्हाच्या तडाख्यात घरादारांतील पखे गरम हवा सोडत होते.
त्यामुळे घरादारांत थांबलेल्या आबालवृध्दांचीदेखील होरपळ सुरुच होती. दुपारच्या भरात सूर्याच्या तीव्र झळांनी घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली. त्यामुळे रसवंतीगृह, शितपेये दुकाने गर्दीने फुलून गेली. सायंकाळी उशीरापर्यंत उन्हाचे चटके सुरुच होते. सूर्य मावळल्यानंतर हवामानात उकाडा वाढला. या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे पसंत केले.
तापमान अंश सेल्सिअस
अहिल्यानगर 40, राहुरी 41, नेवासा 42, कोपरगाव 41, शेवगाव 41, पाथर्डी 40, कर्जत 41, श्रीरामपूर 41, संगमनेर 40, राहाता 41, अकोले 39, पारनेर 39, श्रीगोंदा 41, जामखेड 40.