

नगर: महसूल खाते हे नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करते. त्यामुळे जुन्या महसूल कायद्यांमधील क्लिष्ट प्रक्रिया कमी करून सर्वसामान्यांना जलद न्याय देण्यासाठी कायदे बदलण्यात येत आहेत, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांची थेट सोडवणूक करण्यासाठी शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी (दि.26) आयोजित जनता दरबारात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शैलेश हिंगे, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आदी उपस्थित होते.
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, शेतीच्या रस्त्यांचे वाद मिटवण्यासाठी पुढील पाच वर्षांत सर्व पाणंद रस्ते बारमाही केले जातील व त्यांच्या कडेला वृक्षलागवड केली जाईल. सातबारा उताऱ्यावरील मृत व्यक्तींचे नाव कमी करण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी तहसीलदारांनी स्वतःहून ही दुरुस्ती करावी. जमिनीच्या मोजणीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी खासगी मोजणीदार नेमून ड्रोनच्या साहाय्याने केवळ पंधरा दिवसांत मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गोरगरिबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केवळ एक हजार रुपये शुल्क आकारून ग्रामपंचायतीच्या दप्तरात या घरांची नोंदणी करून मालकी हक्क दिला जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी महसूलमंत्र्यांनी दोनशेहून अधिक नागरिकांची निवेदने प्रत्यक्ष स्वीकारली. यातील काही निवेदनांवर जागेवरच निर्णय दिला, तर काही निवेदनांचा पंधरा दिवसांच्या आत निपटारा करण्याची ग्वाही दिली. यावेळी महसूलमंत्र्यांच्या हस्ते महसुली सेवांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, अकृषिक परवानगी, वाळू धोरण, शेतरस्ते व तुकडेबंदी कायद्याबाबत शासनाने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात केली जात आहे. नागरिकांच्या अडीअडचणी शक्यतो जिल्हा पातळीवरच सोडवल्या जातील व आवश्यकतेनुसार कायद्यात किंवा शासन निर्णयात बदल करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात कोळेकर यांनी केले.
तारखांवर तारखा बंद करा
महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्याच स्तरावर नागरिकांचे प्रश्न सोडवले तर लोकांना मंत्रालयात येण्याची वेळ येणार नाही. महसुली प्रकरणांच्या सुनावणीत तारखांवर तारखा न देता केवळ दोन तारखांमध्ये निर्णय घेण्याचे आदेश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत. दुसऱ्या तारखेला लेखी युक्तिवाद न आल्यास एकतर्फी आदेश काढले जातील, असे त्यांनी सांगितले.
...तर माझ्या व्हॉट्सॲपवर तपशील पाठवा
नागरिकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी महसूल प्रशासन कटिबद्ध आहे. महसूल अधिकाऱ्यांकडे जाऊनही काम पूर्ण न झाल्यास नागरिकांनी माझ्या व्हॉट्सॲप क्रमांकावर स्वतःचे नाव व कामाचा तपशील पाठवावा, असे आवाहन महसूल मंत्री बावनकुळे यांनी जनतेला केले आहे.