नगर: देशात दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून, फसवणुकीचा आकडाही वाढत चालला आहे. अहिल्यानगर सायबर पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून म्युल अकाउंट रॅकेटविरोधात कारवाई सुरू केली असून, फसवणुकीची रक्कम बँक खात्यातून काढणाऱ्या १२ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यात नगर शहर, संगमनेर, शिर्डी, राहुरी, श्रीगोंदा तालुक्यातील व्यक्तींचा समावेश आहे.
याबाबत सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार अमोल आव्हाड यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली. फिर्यादीत म्हटले की, सध्या ऑनलाईन गुंतवणूक योजना, पार्ट-टाईम जॉब ऑफर, डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केटमधील जादा परताव्याचे आमिष, सीबीआय, न्यायालय किंवा इतर सरकारी कार्यालयांचे अधिकारी असल्याची बतावणी करून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते.
यासंबंधी यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाले होते. सायबर गुन्हेगार संघटितपणे काम करीत असून, ते स्वतः च्या बँक खात्यांचा वापर करीत नाहीत. त्या करिता सामान्य नागरिकांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती भाड्याने घेतात किंवा विकत घेतात. अशा खात्यांना ‘म्युल अकाउंट’ म्हटले जाते. फसवणुकीतून मिळालेली रक्कम प्रथम या खात्यांमध्ये जमा करतात. त्यानंतर ती तत्काळ एटीएम किंवा धनादेशाव्दारे काढून घेतली जाते. त्यामुळे पैशांचा डिजिटल मागोवा खंडित होऊन मुख्य आरोपींपर्यंत पोहोचणे कठीण होते.
सायबर पोलिसांनी गृह मंत्रालयाच्या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र यांच्याकडून उपलब्ध झालेल्या माहितीचे विश्लेषण केले. त्यात अहिल्यानगर सायबर पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील काही बँक खात्यांमध्ये देशभरातील विविध सायबर फसवणुकीतील सुमारे ४० लाख ६८ हजार रूपयांची रक्कम जमा झाल्यानंतर ती तातडीने एटीएम, धनादेशाव्दारे तत्काळ काढल्याचे समोर आले आहे.
सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी व गुन्हेगारांची आर्थिक साखळी खंडित करण्यासाठी सायबर पोलिसांनी म्युल अकाउंटचा शोध सुरू केला आहे. अहिल्यानगर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित बँक खात्यांचा, व्यवहारांचा तसेच रक्कम काढणाऱ्या व्यक्तींचा सखोल तपास सुरू केला आहे.