Child Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Bal Sangopan Yojana Beneficiaries: अहिल्यानगर आघाडीवर; ‘बाल संगोपन योजनेत’ 17 हजारांहून अधिक लाभार्थी

महिला व बाल विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्याची राज्यात सरशी; कोट्यवधींचे अनुदान वितरित

पुढारी वृत्तसेवा

नगर: महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अहिल्यानगर जिल्हा राज्यात आघाडीवर असून, ‌‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेत‌’ सर्वाधिक लाभार्थी जिल्ह्यात आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांत 17 हजार 234 लाभार्थ्यांना 23 कोटी 79 लाख 20 हजार रुपये वितरित झाले आहेत.

‌‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेत‌’ सन 2024-25 मध्ये 7 हजार 123 लाभार्थ्यांना 19 कोटी 23 लाख रुपयांचे तर 2025-26 या आर्थिक वर्षात 10 हजार 111 लाभार्थ्यांना आतापर्यंत 4 कोटी 54 लाख 99 हजार 500 रुपये वितरित करण्यात आले असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या प्रतिपालकत्व व प्रायोजकत्व योजनेंतर्गत कोविड-19 काळात पालक गमावलेल्या मुलांना आधार देण्यात आला असून, 1 हजार 521 मुलांना 5 कोटी 47 लाख 56 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.

जिल्ह्यात अनाथ प्रमाणपत्राच्या माध्यमातून 546 मुलांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले असून, त्यापैकी 15 मुलांना शासकीय नोकरी मिळाली आहे ‌‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना‌’ अंतर्गत जिल्ह्यात 11 लाख 39 हजार लाभार्थ्यांना फेब्रुवारीपर्यंत लाभ वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यात ‌‘सखी वन स्टॉप सेंटर‌’ व ‌‘महिला सक्षमीकरण केंद्र‌’ कार्यरत असून, जिल्हा रुग्णालय परिसरात सखी केंद्राची प्रशस्त इमारत आहे. संगमनेर येथे शक्ती सदन व सखी केंद्र सुरू असून अडचणीत आलेल्या महिलांना मदत दिली जाते. तसेच पिंक ई-रिक्शा योजनेद्वारे गरजू महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात मदत केली जात असल्याचे कदम यांनी सांगितले.

वर्षभरात 48 बालविवाह रोखण्यात यश

बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. 27 नोव्हेंबर ते 8 मार्च 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या अभियानादरम्यान प्रभावी जनजागृती व कृतीमुळे हे यश संपादन झाले. मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कार्यरत चाईल्ड हेल्पलाईन (1098) द्वारे 24 तास सेवा उपलब्ध करून दिली जात असून, मागील वर्षभरात 48 बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

बाल संगोपन अंतर्गत 2250 रुपये

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेतंर्गत प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा 2250 रुपये दरमहा अनुदान वितरित केले जात आहे. केंद्र शासनाच्या प्रतिपालकत्व व प्रायोजकत्व योजनेंतर्गत कोविड-19 काळात पालक गमावलेल्या प्रत्येक मुलाला दरमहा 4 हजार 500 रुपये अनुदान दिले जात असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT