नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेकडून कधीही कोणत्याही प्रकल्पाला अथवा विकासकार्यामध्ये खीळ घालण्याची भूमिका नाही. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. संजय राऊत मंगळवारी नाणार प्रकल्पावरून पक्षाच्या भूमिकेबाबत बोलत होते. नाणार प्रकल्प विदर्भात उभारण्याची मागणी कॉंग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली होती. यामध्ये ते म्हणाले, हा प्रकल्प विदर्भात सुरू झाला तर त्याचे स्वागत करू, तसेच मुख्यमंत्र्यांकडे देखील यासंबंधी मागणी करण्यात आली आहे.
राऊत म्हणाले, हा प्रकल्प कुठेही होत असेल त्याला आमचा विरोध नाही. शिवसेनेचा पाठिंबाच राहील, नाणार प्रकल्पाला, तसेच कोणतेही विकास कामे, आणि राष्ट्रीय विकासाला अडथळा आणण्यासाठी शिवसेना कधीच पुढाकार घेणार नाही. पंरतु, या प्रकल्पामुळे कोकणातील शेती, फळबागा, मासेमारीचे नुकसान होणार असल्याने मच्छिमार समाजाकडून या प्रकल्पाला विरोध केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच, विदर्भात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या आसपास काही पाण्याच्या जागा आहेत. जल प्रकल्प आणि नद्या आहेत. तिथे हा प्रकल्प झाला तर त्याचा फायदा महाराष्ट्र आणि विदर्भाला होईल, असे आशिष देशमुख म्हणाले.
परंतु या प्रकल्पाला नाही तर रोजी-रोटी, फळबागेचे आणि शेतीचे नुकसान होवू नये यासाठी विरोध केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी जर प्रकल्पासाठी दुसरी जागा सूचवली असेल तर हा प्रकल्प पूर्ण व्हावा याभूमिकेतून सूचवली असेल, असे राऊत म्हणाले.
हेही वाचा