शरद पवार Pudhari file photo
मुंबई

Mahavikas Aghadi Meeting: शरद पवार गटाची बैठकीत दांडी; विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण

महाविकास आघाडीच्या रणनीती बैठकीत अनुपस्थितीमुळे राजकीय संशय वाढला; काँग्रेसचा सवाल, स्पष्टीकरणांवर समाधान नाही

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी आयोजित केलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मारलेली दांडी हे विलीनीकरणाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे काय, असा प्रश्न केला जात आहे. काँग्रेसने यासंदर्भात आक्षेप व्यक्त केला असून अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला शरद पवार गटाचा एकही आमदार हजर न राहणे हा कशाचा संकेत आहे, असा प्रश्न केला जात आहे.

रविवारी दुपारी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षांनी दुपारी दोन वाजता बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आणि अनिल परब हे नेते उपस्थित होते. काँग्रेसतर्फेही सतेज पाटील, विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्ये नेते हजर होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एकही नेता या बैठकीकडे फिरकला नाही.

शशिकांत शिंदे, जयंत पाटील जि. प. अध्यक्ष निवडणुकीत व्यस्त

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट महाविकास आघाडीबरोबर आहे, मात्र निरोपात विसंवाद झाल्याने त्यांच्या पक्षाचे कोणीही हजर राहू शकले नाही, अशी सारवासारव केली. प्रत्यक्षात सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घडामोडींसाठी माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा घोळ सोडवत त्या निवडणुकीसाठी शशिकांत शिंदे हे विद्यमान प्रदेशाध्यक्ष व्यग्र होते.

आव्हाडांवर जबाबदारी, ते फिरकलेच नाहीत

विधानसभेत पक्षाचे गटनेते असलेल्या डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या बैठकीला हजर राहणे अपेक्षित होते. मात्र ते या बैठकीकडे फिरकलेच नाहीत. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असल्याने हे दोघे हजर राहू शकणार नाहीत, असे कळवण्यात आले होते आणि गटनेता या नात्याने ती जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांची होती. ते का गेले नाही हे आम्हाला माहिती नाही असे स्पष्ट केले.

अनुपस्थितीचे गौडबंगाल

डॉ. आव्हाड यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला असता उत्तर मिळू शकले नाही. ते या बैठकीला गैरहजर का होते हे गौडबंगाल आहे. तीन आठवड्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विलीनीकरणाबद्दल वेगवेगळी विधाने केली आहेत. आमदार रोहित पवार हे अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेत असतानाही विलीनीकरणाचे संकेत देत आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पावले सत्ताधारी महायुतीकडे वळत असल्याने ते गैरहजर राहिले, असा कयास केला जात आहे.

आघाडीत अनुपस्थितीची चर्चा

भास्कर जाधव यांनी या गैरहजेरीचे वेगवेगळे अर्थ काढू नका, असे पत्रकारांची बोलताना वारंवार सांगितले असले तरी ही गैरहजेरी नेमकी कशाची निदर्शक आहे याचे उत्तर शोधण्यात महाविकास आघाडी आणि राजकीय वर्तुळ व्यग्र झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT