मुंबई : सातारा जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या राड्यात शिवसेना मंत्र्यांना झालेली धक्काबुक्की, शिवसेना, राष्ट्रवादी सदस्यांवर झालेला दबावतंत्राचा वापर आणि पोलिसांनी केलेल्या गैरवर्तणुकीमुळे भाजपा आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे. या राड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक विधिमंडळात झाली. या बैठकीत मंत्री आणि आमदारांनी भाजपकडून आपल्याला सत्तेमध्ये दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप केला.
जर मंत्र्यांनाच पोलिसांकडून धक्काबुक्की केली जात असेल आणि मित्रपक्षच आपले निवडून आलेले सदस्य पळवून सत्ता हिरावून घेत असेल तर परिस्थिती गंभीर आहे, याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मात्र, यावेळी एकनाथ शिंदे यांनी संयमी भूमिका घेत हा मुद्दा योग्य त्या ठिकाणी आपण मांडू, असा धीर आपल्या मंत्री आणि आमदारांना दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आणि आमदारांची विशेष बैठक झाली. साताऱ्यातील घटनेमुळे शिवसेनेचे आमदार बैठकीत संतप्त झाले होते. मित्रपक्षाकडून सत्ताधारी मंत्र्यांना आणि आमदारांना मिळणारी दुय्यम वागणूक सहन करण्यासारखी नाही. मित्रपक्ष आपले सदस्य फोडून सत्ता मिळवत आहे. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद आणि पोलीस बळाचा वापर करत आहे. साताऱ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडे बहुमत असतानाही भाजपाने दबावतंत्राचा वापर केला. शंभूराज देसाई यांच्यासारख्या वरिष्ठ मंत्र्याला पोलिसांनी सर्वांच्या समक्ष धक्काबुक्की केली. आपल्या सदस्यांना मतदान करू दिले नाही. असे होणार असेल तर सत्तेचा काय उपयोग? त्यापेक्षा राजीनामे देऊन सत्तेतून बाहेर पडलेले बरं, असा संताप बैठकीत व्यक्त करण्यात आला.
शंभूराज देसाईंनी मांडली हकीगत
बैठकीत शंभूराज देसाई यांनी घडलेली हकीगत मांडली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती असताना मी 33 सदस्यांसह मतदानासाठी जात होतो, मात्र, एका सदस्याचे अपहरण झाल्याची खोटी तक्रार करण्यात आली. मतदान केंद्राजवळ पोहोचल्यावर साध्या कपड्यांतील शंभरपेक्षा जास्त पोलिसांनी मला अडवले. मंत्री असूनही पोलिसांनी मला जबरदस्तीने ओढत नेले, धक्काबुकी केली, असे सांगतानाच मंत्र्यांसोबत असे कुणी वागते का? असा संतप्त सवाल शंभूराज देसाई यांनी केला. या घटनेत माझ्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे राज्यात मंत्री तरी सुरक्षित आहेत का?, असा सवालही त्यांनी उपास्थित केला.
दरम्यान त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेना मंत्री आणि आमदारांनी पायऱ्यांवर निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला. या निदर्शनामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे हेदेखील सहभागी झाले होते. सातारा जिल्हा परिषदेमधील मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार हा लोकशाहीचा खून आहे, असा घणाघाती आरोप या आमदारांनी केला.
या राजकीय राड्यानंतर राज्याचे राजकारण तापले असताना शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मात्र शिवसेनेला आठवण करून देत घरचा आहेर दिला. आमची भाजपसोबत युती असल्यामुळे महाविकास आघाडीसोबत जाण्यास सदस्य तयार नव्हते. ही सगळी वस्तुस्थिती मी एकनाथ शिंदे यांना आधीसुद्धा सांगितली आहे. त्यासोबतच मी पालकमंत्र्यांशी देखील संवाद साधला होता. जर महायुती म्हणून आपण निवडणूक लढवत आहोत, तर मग तुम्ही महाविकास आघाडीसोबत का जात आहात? असा माझा प्रश्न होता, असेही महेश शिंदे म्हणाले. महेश शिंदे यांच्या पत्नीला भाजपने अध्यक्षपदाची उमेदवारी देत त्यांना निवडून आणले. या निवडणुकीत महेश शिंदे गटाने भाजपाला मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सातारा शिवसेनेत या मुद्द्यावर फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.