मुंबई : आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना आता केवळ दहा शाळांचीच निवड करता येणार असून, शाळा व घरातील अंतर गुगल मॅपच्या आधारे निश्चित करूनच शाळा निवडावी लागणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात सुधारित सूचना जारी केल्या आहेत.
सन 2026-2027 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून, अर्ज भरण्याची मुदत 17 फेब्रुवारी ते 10 मार्चदरम्यान राहणार आहे. आरटीई पोर्टलवर अर्ज भरताना पालकांना आपल्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या आत असलेल्या शाळाच निवडता येणार आहेत.
नव्या सूचनांनुसार, 25 टक्के प्रवेशासाठी पालकांनी विचारपूर्वक जास्तीत जास्त दहा शाळांचीच निवड करावी लागणार आहे. अनेक शाळांची निवड करता येत असल्याने काही पालक दूरच्या शाळाही पर्यायात ठेवत होते. मात्र आता गुगल मॅपच्या आधारे घर ते शाळेचे हवाई अंतर निश्चित करूनच शाळा निवडावी लागणार आहे.
दरम्यान, अर्ज प्रक्रियेनंतर ऑनलाईन सोडत काढून प्रवेश दिला जाणार असून, उपलब्ध जागांइतकी प्रतीक्षा यादीही तयार केली जाणार आहे. सोडतीत नाव लागल्यानंतर पालकांना कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश घ्यावा लागणार आहे.
प्रवेशासाठी जात, उत्पन्न, निवास, जन्मतारीख आदी कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असून, चुकीची माहिती दिल्यास प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याचा इशाराही परिपत्रकात देण्यात आला आहे.
या नव्या नियमांमुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत घराजवळील शाळांना प्राधान्य मिळणार असून, दूरच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची शक्यता कमी होणार आहे. पालकांनी वेळेत आणि अचूक माहिती देऊन अर्ज सादर करण्याचे आवाहन संचालक शरद गोसावी यांनी केले आहे.\
ऑनलाइन अर्ज भरताना पालकांना घराचे लोकेशन ‘बॅलून’च्या माध्यमातून अचूक दाखवावे लागणार आहे. हे लोकेशन बदलण्याची संधी जास्तीत जास्त पाच वेळाच मिळणार असल्याने पालकांनी काळजीपूर्वक अचूक पत्ता नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.