मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांवर दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असते. उपनगरीय आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांची ये-जा, प्रवाशांची घाई सुरू असते आणि बहुतांश लोक आपल्या निश्चित स्थळी पोहोचण्याच्या घाईत असतात. मात्र या गर्दीच्या वातावरणात स्थानकांवर झालेला एक छोटासा बदल शहरातील स्थानिक कारागिरांसाठी नव्या संधी निर्माण करत आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या एक स्थानक - एक उत्पादन (वन स्टेशन वन प्रॉडक्ट) या उपक्रमांतर्गत स्थानिक उत्पादने आणि पारंपरिक हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध रेल्वे स्थानकांवर एक महिन्याच्या कालावधीसाठी फिरत्या पद्धतीने स्टॉल उपलब्ध करून दिले जात आहेत. दररोज हजारो प्रवासी ये-जा करत असलेल्या ठिकाणी लघुउद्योजकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड, ठाणे आणि कल्याण या स्थानकांवर उभारण्यात आलेल्या छोट्या स्टॉलमुळे धारावीतील चर्मोद्योग कारागिरांना नव्या उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होत आहेत. या स्टॉलवर धारावीमध्ये तयार होणाऱ्या हस्तकलेच्या चामड्याच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री केली जात आहे.
अनेक दशकांपासून धारावी हे मुंबईतील सर्वात सक्रिय चामड्याच्या उद्योगांपैकी एक केंद्र राहिले आहे. येथील अरुंद गल्ल्यांमधील छोट्या कार्यशाळांमध्ये कारागीर चामड्यापासून बॅग, पाकिटे, पट्टे आणि इतर आकर्षक वस्तू तयार करतात. या वस्तू प्रामुख्याने घाऊक विक्रेत्यांमार्फत बाजारात पोहोचत असत. शहरातील अनेक ग्राहकांनी या वस्तू वापरल्या असतील, पण त्या धारावीमध्ये तयार झालेल्या आहेत, याची त्यांना माहिती देखील नसते.
कुर्ला स्थानकावर स्टॉल चालवणारे जयंत चंद्रगिरी यांच्या मते, स्थानकांवरील मोठी प्रवासी संख्या हीच मोठी संधी ठरत आहे. “धारावीतील उद्योजकांसाठी रेल्वे स्थानकावर स्टॉल मिळणे म्हणजे जणू एका नव्या जगात प्रवेश केल्यासारखे आहे,” असे जयंत चंद्रगिरी म्हणतात. “दररोज हजारो लोक स्थानकातून ये-जा करतात. काही जण वस्तू पाहण्यासाठी थांबतात, तर काही जण नंतर खरेदीसाठी परत येतात. यापूर्वी लोकांपर्यंत पोहोचणे हे आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते. आता मात्र लोक स्वतः आमच्यापर्यंत येत आहेत,” असे ते आनंदाने सांगतात.
धारावीतील उद्योजकांसाठी विक्री इतकीच ग्राहकांशी थेट जोडले जाणे देखील महत्त्वाचे आहे. ग्राहकांशी थेट संवाद साधल्यामुळे लोकांच्या आवडी-निवडी समजून घेण्यास मदत होते आणि कोणत्या प्रकारच्या डिझाइन्सना जास्त पसंती आहे, याचीही कल्पना येते. या अनुभवामुळे भविष्यात अनेक लघुउद्योजकांसाठी नवी व्यावसायिक दालने खुली होऊ शकतात. सध्या तरी, रेल्वे स्थानकावरील फलाट हा केवळ प्रवासाचा टप्पा राहिलेला नाही. तो आता एका अशा छोटेखानी बाजारपेठेत रूपांतरित झाला आहे, जिथे धारावीची दीर्घ परंपरा असलेली हस्तकला थेट शहरातील विविध भागांतील ग्राहकांना कारागिरांसह पाहता येत आहे.
प्रवासी गाडीची वाट पाहताना अनेकदा स्टॉलला भेट देतात. पाकिटे आणि पट्टे पाहतात, तर विद्यार्थी बॅग आणि लहान गोष्टी पाहतात. काही प्रवासी दररोजच्या प्रवासात स्टॉल पाहिल्यानंतर नंतर परत येऊन खरेदी करतात. अनेक कारागिरांसाठी ग्राहकांशी थेट संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी आमची उत्पादने प्रामुख्याने मध्यस्थांमार्फत विकली जात होती. आम्ही चांगल्या दर्जाच्या वस्तू तयार करत होतो, पण लोकांना आम्ही कुठे आहोत हेच माहीत नव्हते.दत्तू कांबळे, स्टॉलचालक, मुलुंड स्थानक