मुंबई : चंदन शिरवाळे
युतीची सत्ता वगळता अनेक वर्षे राज्याच्या सत्तेची सूत्रे हाती बाळगलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला भिवंडी-निजामपूर, नवी मुंबई, मिरा - भाईंदर, उल्हासनगर आणि वसई-विरार या पाच महानगरपालिकांच्या निवडणुकात साधा भोपळाही फोडता आला नाही. अजित पवार यांच्या गटाला 24 महानगरपालिकांमध्ये 156, तर शरद पवार गटाला केवळ 21 जागांवर विजय मिळाला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड हा पवार कुटुंबीयांचा राजकीय बालेकिल्ला समजला जातो. आपला बालेकिल्ला सांभाळण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार गटाने आघाडी केली. पण हा बालेकिल्लाही भाजपाने उद्ध्वस्त केला. पुणे महानगरपालिकेत अजित पवार गटाला 14, तर शरद पवार गटाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले.
चिंचवड महानगरपालिका जिंकण्याच्या दिशेने मैदानात उतरलेल्या अजित पवार गटाला या ठिकाणी 37 जागा मिळाल्या, तर शरद पवार गटाला भोपळाही फोडता आला नाही.
सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, पनवेल, जळगाव, लातूर, परभणी, नांदेड, नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती महानगरपालिकांमध्येही या पक्षाची अशीच अवस्था राहिली. नको चुलता, नको पुतण्या असे म्हणत महानगरपालिकांमधील नागरिकांनी अजित पवार व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नाकारले आहे.
महायुतीमध्ये असूनही भाजपाने या महापालिका निवडणुकांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेतले नाही. पराभव टाळण्यासाठी अजित पवारांनी मग शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी केली. परंतु, काका-पुतण्याचा एकीचा डाव मतदारांना आवडला नाही. नाइलाज म्हणून एकमेकांना मैत्रीची टाळी देणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अंगलट आले. दोघा पवारांकडे पाठ फिरवत मतदारांनी भाजपला आपला पर्याय निवडला.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे घेतली होती. त्यामध्ये शरद पवार गटाच्या नेत्यांना दुय्यम स्थान होते. अर्थमंत्री असलेले अजित पवार केवळ घोषणांचा पाऊस पाडत होते. मात्र महापालिकांमधील पाणी, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, अनधिकृत बांधकामे, विकासकामांचा वेग या मुद्द्यांवर ठोस व एकसंध भूमिका ते मांडू शकले नाहीत. बूथ-स्तरावरील व्यवस्थापन, कार्यकर्त्यांची एकजूट आणि प्रभावी प्रचार यामध्ये दोन्ही गट पिछाडीवर राहिले.
गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि पिंपरी- चिंचवडचे शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. मुंबईप्रमाणे या दोन्ही शहरांवरही अमराठी भाषकांचे लोंढे धडकत आहेत. हे सर्व भाजपाचे मतदार आहेत. त्यांना आपल्याकडे वळविण्यात पवार फॅमिलीला अपयश आले. अमराठी मतदारांना गृहीत धरण्याची चूक त्यांना भोवली.
विजयी नगरसेवकांच्या संख्येवरून दोन्ही राष्ट्रवादी गटांची विश्वासार्हता कमी झाल्याचा संदेश या निवडणूक निकालाने गेला आहे. नेतृत्व, स्थानिक चेहऱ्यांची निवड, विकासाचा अजेंडा आणि एकत्रित रणनीतीवर दोन्ही गटांनी भर दिला नव्हता.
या पार्श्वभूमीवर शहरी आणि ग्रामीण मतदार परत मिळवण्यासाठी ठोस कार्यक्रम आणि संघटनात्मक पुनर्बांधणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला करावी लागणार आहे. अन्यथा या पक्षांना कायमचा कात्रजचा घाट पाहावा लागेल, अशी चर्चा या निवडणूक निकालावरून सुरू झाली आहे.
महानगरपालिकांच्या निवडणुकीत स्थानिक चेहऱ्यांना महत्त्व असते.अजित पवार यांना पुण्यातील जनतेनेच नाही, तर 29 शहरांतील मतदारांनी नाकारले आहे. त्यांच्याकडे सत्तेचा फायदा असूनही महापालिका स्तरावर त्यांना ठोस कामगिरी दाखवता आली नाही.
शरद पवार यांचा करिष्मा आता मावळत चालला असला तरी, त्यांनीही महानगरपालिकांच्या निवडणुकीतून अंग काढून घेतले होते. अजित पवार यांना धडा शिकविण्यासाठी ते बाजूला राहिले की त्यांना त्यांचे सामर्थ्य कळाले, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
अनेक प्रभागांत दोन्ही राष्ट्रवादींचे उमेदवार एकमेकांचेच मत कापत राहिले.
शहरांमधील मूड ओळखण्यात अपयश
एकमेकांमधील अंतर्गत संघर्ष लपवता आला नाही.
निवडणुकीची एकहाती सूत्रे
पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, पीएमपीएमएल/पीएमटी सेवा, कचरा व्यवस्थापन, अनधिकृत बांधकाम या मुद्द्यांवर दोन्ही राष्ट्रवादी गटांकडून ठोस आणि परिणामकारक मांडणीचा अभाव.
बूथ पातळीवरील यंत्रणा कमकुवत.
अनेक ठिकाणी पदाधिकारी निष्क्रिय.