मुंबई : प्रत्येक निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांकडून मुंबई पाणीटंचाई मुक्त करू असे आश्वासन दिले जाते. पण आजतागायत मुंबईकरांची पाणीटंचाईतून सुटका झालेली नाही. त्यामुळे आजही नगरसेवकांना पाणीटंचाईवरून महापालिका सभागृहात चर्चा करावी लागत आहे. मुंबईचे हृदय समजल्या जाणाऱ्या दादरसारख्या भागातही पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे.
मुंबई शहरातील पाणीटंचाईवर गेल्या चार ते पाच दशकापासून महापालिका सभागृहात व समिती सभागृहात वादळी चर्चा झाल्या. पण 50 वर्षात मुंबईतील पाणीटंचाईचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे स्थायी समितीच्या पहिल्या सभेतच सर्व पक्षीय नगरसेवकांनी पाणीटंचाईकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यानची आपली आठवण सांगितली.
आपण दादरमध्ये प्रचार करत असताना अनेक महिला घरामध्ये पाणी येत नसल्यामुळे इमारतीच्या खाली येऊन पाणी भरताना दिसून आल्या. यावेळी अनेकांनी पाणी टंचाईबद्दल नाराजीही व्यक्त केली. जर मुंबईचे हृदय समजल्या जाणाऱ्या दादरमध्ये अशी अवस्था असेल तर मुंबईतील डोंगराळ भागातील पाणीटंचाईची कल्पनाही न केलेली बरी, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
काँग्रेसचे गटनेता अशरफ आझमी यांनी उंच इमारतीमध्येही पाण्याची टंचाई भासत असल्याचे सांगितले. झोपडपट्टीवासीय तर पाणीटंचाईने अक्षरशः त्रस्त आहेत. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे एक मिनिटात भरणाऱ्या हंड्याला तीन ते चार मिनिटे लागतात, अशी खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली. नगरसेवकांनी तक्रार केल्यानंतर काही दिवस पाण्यामध्ये सुधारणा होते. मात्र पुन्हा काही दिवसात येरे माझ्या मागल्या सारखी परिस्थिती होते. एका भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी दुसऱ्या भागातील पाण्याचा दाब कमी करण्यात येतो, असा आरोपही यावेळी नगरसेवकांनी केला. पाणीटंचाईबद्दल नगरसेवकांनी व्यक्त केलेल्या व्यथांची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले आहेत. यावर योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा यांनी दिले.
शहर : कुलाबा, वरळी, भायखळा, दादर, धारावी, सायन
पश्चिम उपनगर : बांद्रा, खार, सांताक्रुझ, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, मालवणी, दहिसर
पूर्व उपनगर : कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर, घाटकोपर, भांडुप, कांजूर
मुंबईतील पाणी टंचाईकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई महानगरपालिका सभागृहाची विशेष बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत संपूर्ण मुंबई शहर व उपनगरातील पाणीटंचाईचे चित्र स्पष्ट होईल, असे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले.