मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समिती भाजपाकडे, तर सुधार समिती शिवसेनेकडे ठेवण्यावर महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत पुढील आठवड्यात मंगळवारपूर्वी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठक होऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबईच्या महापौरपदी व उपमहापौर पदी भाजपाच्या रितू तावडे व शिवसेनेचे संजय घाडी विराजमान झाले आहेत. त्यामुळे आता महापालिकेतील प्रमुख समित्या कोणाकडे यावरून महायुतीमध्ये मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. महापालिकेत स्थायी, सुधार, शिक्षण व बेस्ट या चार वैधानिक समित्या आहेत. यातील स्थायी व सुधार समितीवरून गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये चर्चा सुरू होती. भाजपाने स्थायी समिती सोडण्यास नकार दिल्यामुळे शिवसेनेने किमान सुधार समिती मिळावी, यासाठी आग्रही भूमिका मांडली.
सुधार समितीमध्ये महायुती व विरोधकांमध्ये समसमान सदस्य संख्या राहणार असल्यामुळे या समितीचे अध्यक्षपद चिठ्ठीवर ठरणार होते. परंतु शिवसेनेने पुढाकार घेत राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेवकांना शिवसेनेच्या गटात सामावून घेण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे सुधार समितीमध्ये महायुतीच्या सदस्यांचे संख्याबळ एकने वाढणार आहे. शिवसेनेच्या रणनीतीमुळे ही सदस्य संख्या वाढणार असल्यामुळे सुधार समिती शिवसेनेला मिळावी, असे भाजपाकडे आग्रह धरण्यात आला होता. भाजपानेही एक पाऊल मागे टाकत सुधार समिती शिवसेनेला सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. याबाबत अंतिम निर्णय मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिक्षण व बेस्ट समितीबाबतचा निर्णय लवकरच होणार शिक्षण समिती व बेस्ट समिती कोणाकडे असावी याबाबत अद्यापपर्यंत महायुतीमध्ये एकमत झालेले नाही. परंतु यापैकी शिक्षण समिती भाजपाकडे येण्याची शक्यता असून बेस्ट समिती शिवसेनेला दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. सहा विशेष समित्यांमधीलही चार समित्या भाजपाकडे, तर दोन समित्या शिवसेनेकडे राहण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीसह सुधार, शिक्षण व बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी बुधवार 18 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे 18 फेब्रुवारी सकाळपर्यंत अध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावे घोषित होतील, असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.