मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमार्फत दरवर्षी मुंबईसह शहराबाहेरील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. मात्र, रक्तसंकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या परवानगी प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलांमुळे ही शिबिरे आयोजित करणे कठीण बनले आहे. परिणामी येत्या काळात रक्तकोंडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होऊ शकतो.
पूर्वी रक्तसंकलनासाठी लागणारी वाहने शहराबाहेर नेण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांची स्वाक्षरी पुरेशी ठरत होती. त्यानंतर वाहन विभागाकडून मंजुरी दिली जात असे. मात्र, नव्या नियमानुसार अतिरिक्त आयुक्तांची स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली आहे. या बदलामुळे परवानगी प्रक्रियेत विलंब होत असल्याची तक्रार रक्तपेढ्यांकडून करण्यात येत आहे.
विशेषतः पनवेलसारख्या शहराबाहेरील परिसरात नियमित रक्तदान शिबिरे घेतली जातात. एप्रिल-मे महिन्यांत आणि रमजान काळात शहरातील रक्तदान शिबिरांची संख्या घटते. अशा वेळी बाहेरील शिबिरांमधून होणारे रक्तसंकलन अत्यंत महत्त्वाचे ठरते. मात्र, वाहन परवानगीतील अडथळ्यांमुळे नियोजित शिबिरे रद्द करण्याची वेळ येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
केईएम रुग्णालयातून शिबिरासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देताना प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याची माहिती समोर आली आहे. कारण आता प्रत्येक वेळी अधिष्ठात्यांची स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली असून प्रक्रिया अधिक किचकट झाली आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे खासगी रक्तपेढ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालिका रक्तपेढ्यांच्या शिबिरांवर मर्यादा आल्यास खासगी संस्थांकडे मागणी वाढू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मुंबईबाहेर जाण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करावी, अन्यथा शहराबाहेरील रक्तसंकलन थांबण्याची चिन्हे आहेत, अशी मागणी रक्तपेढ्यांकडून करण्यात येत आहे.