Mumbai Heatwave Pudhari
मुंबई

Mumbai Heatwave: मार्चच्या सुरुवातीलाच मुंबईत उष्णतेचा तडाखा; तापमान 36 अंशांवर

अँटीसायक्लोनचा परिणाम; दुपारी 12 ते 4 दरम्यान घराबाहेर न पडण्याचा महापालिकेचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मार्चच्या सुरुवातीलाच मुंबईत उन्हाच्या तीव्र झळा मुंबईकरांना बसत आहेत. शुक्रवारी शहरातील कमाल तापमानाने 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या वेळेत नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून शहरात उष्ण व दमट वातावरणाचा त्रास जाणवू लागला आहे.

दुपारी 12 ते 4 या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असल्याने रस्त्यांवरील वर्दळही कमी झाल्याचे दिसून आले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस शहरातील तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्च महिन्यातच उन्हाचा तडाखा वाढत असल्याने मुंबईकरांनी काळजी घेण्याची गरज असून नागरिकांना दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, हलके कपडे परिधान करणे आणि उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

घराबाहेर पडू नका

दरम्यान, शहर आणि उपनगरांमधील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर 37 अंश सेल्सिअसपेक्षा तापमान असेल तेव्हा लोकांना बाहेर पडू नये असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

गुरुवारी कमाल तापमान 38 अंशांवर गेल्याने अनेक मुंबईकरांनी डोकेदुखी आणि थकवा जाणवत असल्याची तक्रार केली होती. उन्हामुळे गंभीर तक्रारी आढळल्या नाहीत, असे डॉक्टर आणि महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाढत्या उष्णतेचा अनेकांना त्रास होत असल्याबाबत महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे. आमच्याकडे वातानुकूलित आपला दवाखाना आहेत. जिथे रुग्णांना गरज पडल्यास पाणी आणि औषधे उपलब्धता होऊ शकतात. मात्र, वाढत्या ऊन्हात 50 पेक्षा जास्त कामगार असलेल्या बांधकाम साईटवर डॉक्टर असणे आवश्यक आहे, असे बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी म्हटले आहे उष्णतेच्या लाटेमुळे रुग्ण दगावण्याच्या फारच कमी घटना मुंबईत घडतात. तरीही दुपारी 12 ते दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घराबाहेर पडू नये. तसेच चक्कर येणे, मळमळणे आणि जास्त घाम येणे यासारख्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका, असे डॉ. सावला म्हणाल्या.

दोन वर्षांपूर्वी, केंद्रीय मंत्रालयाने सर्व आरोग्य विभागांना उष्णतेच्या लाटेदरम्यान एक मानक प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला दिला होता. हाच धागा पकडून, उष्णतेची लाट येताच सर्व रुग्णालयांमध्ये मानक प्रोटोकॉल लागू होईल, असे डॉ. दिक्षा शाह म्हणाल्या. उष्णतेच्या लाटेदरम्यान प्रत्येक सार्वजनिक रुग्णालयात रुग्णांसाठी एका वातानुकूलित खोलीत दोन बेड ठेवले जातील. तिथे पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध असेल.

अँटीसायक्लोनमुळे तापमानात वाढ

दक्षिण गुजरात आणि शेजारच्या भागात उष्ण वारे सोडणाऱ्या अँटीसायक्लोनमुळे तापमानात वाढ झाल्याचे आयएमडीच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर म्हणाल्या. हिवाळ्यापासून उन्हाळ्यात हंगामी संक्रमणादरम्यान तापमानातील वाढ सामान्य आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अजूनही तुलनेने कमी असल्याने आणि उत्तरेकडून येणारे कोरडे वारे एमएमआरमध्ये धडकत असल्याने तापमानात अल्पकालीन वाढ सामान्य आहे, असे त्यांनी सांगितले. आयएमडीच्या माहितीनुसार, 5 मार्च (38 अंश सेल्सिअस) हा यंदाच्या वर्षातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. 28 मार्च 1956 रोजी मुंबईत 41.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. आजवरचे मार्च महिन्यातील हे सर्वाधिक तापमान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT