मुंबई/नवी मुंबई : द्राक्षांचा हंगाम सुरू झाला असून नाशिक, पुणे आणि सांगलीतील गोड, रसाळ आणि आकर्षक रंगाची द्राक्ष बाजारात आली आहेत. मात्र आवक कमी असल्याने द्राक्षांचे दर चढेच आहेत. यंदा ‘सोनका’ आणि ‘शाईन मस्कत’ या दर्जेदार द्राक्षांना ग्राहकांकडून विशेष पसंती आहे. मात्र किरकोळ बाजारात 100 ते 200 रुपये तर काळ्या द्राक्षांचे दर हे 300 रूपये प्रतिकिलोपर्यंत आहेत.
सध्या एपीएमसीतील फळ बाजारात पुणे, नाशिक आणि सांगली येथून मोठ्या प्रमाणात द्राक्षांची आवक सुरू आहे. बाजारात आंबट-गोड चवीची पिवळसर-हिरवी द्राक्षे, काळ्या रंगाची द्राक्षे तसेच काही विदेशी द्राक्षही उपलब्ध झाली आहेत.
मात्र अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि काही भागात रोगराईमुळे यंदा द्राक्षांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून बाजारात आवक मर्यादीत आहे. घाऊक बाजारात दर्जानुसार द्राक्षांचे दर 130 ते 150 रुपये प्रतिकिलो दरम्यान आहेत.तर किरकोळ बाजारात हीच द्राक्षे 230 ते 270 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहेत.
गोडी आणि दर्जामुळे ग्राहकांची मागणी चांगली आहे. मात्र दर जास्त असल्याने ते नाराज होत असल्याचे मुंबईतील विक्रेते चंद्रकांत धुमाळ यांनी सांगितले. नाशिक आणि सांगली भागातून ताजी द्राक्षे बाजारात दाखल होत असून दर्जेदार मालाला चांगला प्रतिसाद मिळतोय. ग्राहकही आता क्वालिटी पाहून खरेदी करत असल्याचे लाला सिंग यांनी सांगितले. विशेषतः ‘शाईन मस्कत’सारख्या प्रीमियम द्राक्षांना चांगला दर मिळत असून त्यांची मागणी वाढली आहे.
यंदा वातावरणातील उष्णता वाढल्याने द्राक्षांची गोडी अधिक वाढली असून ती अधिक रसाळ झाली आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये द्राक्षांची मागणी वाढत असून बाजारात व्यवहार तेजीत आहेत.
यंदा द्राक्षांचे उत्पादनच कमी झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक मर्यादित असून दर कमी होण्याची शक्यता फारच कमी आहे. सध्या जी द्राक्षे येत आहेत ती दर्जेदार असली, तरी पुरवठा कमी असल्याने भाव तेजीत आहेत. पुढील काही दिवसांत आवक वाढली नाही, तर दर आणखी वाढू शकतात.संजय पानसरे, व्यापारी
सामान्य दर्जा : 60 ते 140 रुपये
चांगला दर्जा : 180 ते 200
काळी द्राक्ष : 300