मुंबई : दिलीप सपाटे
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी गुरुवारी झालेल्या मतदानात गोंधळाच्या अनेक तक्रारी नोंदविल्या गेल्या. बोटावरील शाई पुसली जाणे, बोगस मतदान, मतदारांना पैसे वाटणे, वोटिंग मशीनमध्ये बिघाड आणि यादीत नावच नसल्याने मतदारांचे मतदान केंद्रावरून परत जाणे असे असंख्य प्रकार घडले. काही ठिकाणी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळी मतदान सुरू होताच मतदान केंद्र बदलले जाणे, मतदारांची नावे सापडत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. नवी मुंबईत खुद्द वनमंत्री गणेश नाईक हे आपले मतदान केंद्र शोधत फिरत होते. त्यांचेे मतदान केंद्र बदलण्यात आल्याने त्यांना कोणत्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचे तेच माहिती नव्हते. तासाभराने त्यांना त्यांच्या मतदान केंद्राचा शोध लागला. ही अवस्था राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्याची होते तेव्हा सामान्य मुंबईकर किंवा नवी मुंबईकर मतदारांनी काय सोसले असेल याची कल्पनाही न केलेली बरी.
ईव्हीएम मशीन बंद पडणे, त्यामध्ये बिघाड होणे, बटणच दाबले न जाणे अशाही तक्रारी सर्वच महापालिका क्षेत्रांतून आल्या. मुंबईत धारावी येथील वॉर्ड क्रमांक 184 येथे मशाल चिन्ह दाबले जात नव्हते, अशीही तक्रार मतदारांनी केली.
मोठा वाद उभा राहिला तो बोटाला लावल्या जाणाऱ्या शाईवरून. एक तर मागच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या विपरीत यावेळी मार्कर पेन वापरला गेला. या पेनने बोटावर दोन,तीन वेळा घासून लावलेली शाई नंतर पुसली जात असल्याचे लक्षात आले. मुंबईपासून सर्वच महापालिका क्षेत्रांतून या तक्रारी आल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही शाईच्या मुद्द्यावर राज्य निवडणूक आयोगाला धारेवर धरले. निवडणूक आयोगाकडून शाई नव्हे, तर लोकशाही पुसली जात आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
चेंबूर, मानखुर्द येथील मतदान केंद्रांवर अनेक चिन्हांसमोरील बटण दाबले जात नसल्याची तक्रारही मतदारांनी केला. धुळ्यात प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेनेच्या उमेदवार पार्वती जोगी यांनी मतदान यंत्रांमध्ये बिघाड करण्यात आल्याचा आरोप केला. कमळाचे बटण दाबले जात आहे, मात्र इतर बटण दाबले जात नाही, असे जोगी सांगत होत्या.
यावेळी व्हीव्हीपॅट नसल्याने निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लावले गेले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिन होते. यामुळे मतदाराने केलेले मतदान हे त्याच चिन्हाला गेले आहे का, हे दिसत होते आणि मतदार ते पाहून बाहेर पडत होता. मात्र महापालिका निवडणुकीमध्ये आयोगाने व्हीव्हीपॅट मशिनचा वापर टाळल्याने एकूण निवडणूक प्रक्रियेचा पारदर्शकतेवर शंका उपस्थित झाली.
मुंबईत दादरमधील वॉर्ड क्रमांक 191 मधील ठाकरे गटाच्या उमेदवार विशाखा राऊत यांच्या नावासमोरील बटण दाबलेच जात नसल्याची तक्रार करण्यात आली. खातरजमा केल्यानंतर निवडणूक यंत्रणेने तिथले ईव्हीएम बदलले.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते अंकुश काकडे यांनी ईव्हीएम मशीनच्या कार्यप्रणालीवर आक्षेप नोंदवला. मतदान केंद्रावर पहिल्या तीन मतदानांनंतर चौथ्या मतदानाच्या वेळी मशीनवरील लाईटच पेटली नाही, असा आक्षेप काकडे यांनी घेतला.
पुण्यातल्या धायरी परिसरात बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला. येथे बाहेरून काही महिलांना आणून मतदान करून घेतलं जात असल्याचा आरोप झाला. शिवाय एका विशिष्ट लिक्विडचा वापर करून शाई देखील पुसली जात होती. ही शाई पुसून पुन्हा या महिला मतदान करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला.
पुण्याच्या प्रभाग क्रमांक 25 कोणतेही बटन दाबले तरी ‘कमळ’ या चिन्हाचाच लाईट लागत होता. यातून संशय कल्लोळ झाला. काही वेळातच मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार रूपाली ठोंबरे पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेश भोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन मशीन तात्काळ बदलण्याची व मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली. सुमारे तासाभरानंतर दुपारी 3.30 च्या सुमारास निवडणूक अधिकारी मतदान केंद्रावर दाखल झाले. ईव्हीएमची तपासणी करून तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आणि 3.45 वाजता मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली. पण एक ते दीड तास मतदान बंद राहिल्यामुळे मतदार आणि मतदान रखडले.
नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजप उमेदवार नितीन खोले यांच्या घरावर हल्ला झाला. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नितीन खोले हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गट व भाजप पदाधिकारी एकमेकांसमोर भिडले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये यास्मीन आमेर पठाण ही महिला एका अपक्ष उमेदवाराची पत्नी आहे. तासभर मतदानासाठी रांगेत उभे राहिल्यानंतर ती मतदानाला गेली तेंव्हा तीला तुमचे मतदान झाल्याचे सांगण्यात आले. त्यावरून या महिलेने बोगस मतदानाचा आरोप करीत गोंधळ घातला.
मालेगावमध्ये एकाच ठिकाणी 800 पेक्षा जास्त मतदार कार्डे सापडल्याने खळबळ उडाली. मतदान केंद्राला लागूनच असलेल्या एका घरात ही कार्डे असल्याचे समोर आल्यावर प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली.