मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होत असून 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. मात्र, राज्यावर कोट्यवधी रुपयांचा असलेला कर्जाचा डोंगर, ‘लाडकी बहीण’सह विविध योजनांसाठी होणारा प्रचंड खर्च, विविध पायाभूत प्रकल्पांमुळे तिजोरीवर पडणारा ताण लक्षात घेऊन अर्थसंकल्पात नवीन योजना आणि घोषणांना ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्राचा नवा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी एक महिन्याचा अवधी असला तरी प्रशासकीय पातळीवर अर्थसंकल्प तयार करण्यासाठी वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी पूर्वतयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यानुसार विविध विभागांचा आढावा घेण्यासही सुरुवात केली होती. परंतु, गेल्या आठवड्यात झालेल्या त्यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या निधनानंतर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असल्याने त्यामध्ये अर्थसंकल्प कोण मांडणार अशी चर्चा सुरू होती. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थ खात्याची धुरा आपल्याकडे घेतल्याने आता तेच विधिमंडळात अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यानुसार 6 मार्च रोजी विधिमंडळात अर्थसंकल्प मांडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. तसेच 5 मार्च रोजी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यामुळे विधिमंडळाच्या इतिहासात मुख्यमंत्री असूनही अर्थसंकल्प मांडणारे फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत. यापूर्वी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना फडणवीस यांच्याकडे अर्थमंत्री खात्याची जबाबदारी होती. त्या सरकारमध्ये फडणवीस यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला होता. आता राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत.