Konkan Railway Issues
मुंबई : उत्तरेकडे जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांतील प्रवास त्रासदायक असतो, असे नेहमी महटले जाते. पण जर कधी कोणी येऊन, कोकण रेल्वेचा प्रवास बघितला तर 'नको रे बाबा असा प्रवास', असे म्हणायची वेळ येईल. इतका खडतर प्रवास कोकण रेल्वेचा आहे. पण हा प्रवास त्रासदायक ठरत असला तरी भाडे कमी असल्यामुळे चाकरमान्यांची याच प्रवासाला अधिक पसंती दिसून येते.
मे महिना म्हटला की, झाडून चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे सध्या कोकण रेल्वे मार्गावर जाणाऱ्या सर्वच गाडया हाउसफुल असून साधी वेटिंगची तिकीटही मिळेनाशी झाली आहेत. त्यामुळे मिळालेल्या वेटिंग तिकीट रद्द न करता व जनरल तिकीट काढून चाकरमान्यांचा मुंबई ते कोकण खडतर प्रवास सुरू आहे. सध्या मांडवी, कोकणकन्या, तुतारी या एक्सप्रेससह कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण रिग्रेट असे दाखवण्यात येते. त्यामुळे चाकरमान्यांसमोर जनरल तिकीट घेणे हाच पर्याय उरला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दादर व ठाणे रेल्वे स्टेशनवर सध्या चाकरमान्यांची मोठी गर्दी दिसून येते. जनरल डब्यात बसायला मिळावे, यासाठी गाडी सुटायच्या अगोदर किमान चार ते पाच तास रांगा लावण्यात येतात. त्यामुळे उशिरा आलेल्या चाकरमानांना जनरल डब्यात उभे राहण्याइतकीही जागा मिळत नाही. पण गावी जायची हौस असल्यामुळे चाकरमानी अगदी टॉवलेटमधूनही प्रवास करतात.
सीएसएमटी येथे कोकणकन्या व दादर येथे तुतारी प्रवाशांनी खचाखच भरून जात असल्यामुळे कोकणकन्याला दादर, ठाणे, पनवेल तर तुतारीला ठाणे पनवेलमध्ये जनरल डबा सोडा स्लीपर डब्यातही शिरता येत नाही.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या स्लीपर कोचमध्ये आसनपिक्षा दुप्पट गर्दी वेटिंग व जनरल तिकीट असलेल्या प्रवाशांची असते. त्यामुळे ही घुसखोरी कधी थांबणार, असा सवाल आता चाकरमानीच उपस्थित करू लागले आहेत.
सामान्य प्रवाशाने तत्काळ तिकीट काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिकीट मिळत नाही. पण प्रत्येक तिकिटासाठी ५०० ते १ हजार रुपये मोजल्यास प्रवाशांना एजेंट मार्फत हमखास तिकीट मिळते.
कोकण रेल्वे मार्गावरील एसीचा प्रवास मात्र आरामदायी ठरत आहे. पण एसीचे तिकीट गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांनी अगोदरच आरक्षित केल्यामुळे २० ते २५ टोके चाकरमान्यांना आगाऊ तिकीट मिळतात. अन्यथा तत्काळ तिकिटासाठी प्रतीक्षा करावी लागते. मात्र तात्काळ तिकीटही अवध्या एक ते दोन मिनिटात हाऊसफुल होत असल्यामुळे चाकरमान्यांची निराशाच होते.