Ajit Pawar Plane Crash Investigation Explained
पुढारी मल्टीमीडिया टीम
मुंबई: बारामती विमानतळावर लॅंडिंग करताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान कोसळलं. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह ५ जण मृत्युमुखी पडले. कोणत्याही विमान दुर्घटनेनंतर त्याची चौकशी होते. त्यानुसार या प्रकरणात चौकशीची चक्रे वेगाने फिरत आहेत. अशा हाय-प्रोफाईल आणि गंभीर अपघातांच्या चौकशीसाठी एक विशिष्ट प्रोटोकॉल असतो. तो नेमका काय असतो, ते समजून घेऊया…
अशा विमान दुर्घटनांची चौकशी 'एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो' अर्थात AAIB ही केंद्रीय संस्था मुख्यत्वे करत आहे, तर गुन्हेगारी किंवा घातपाताची शक्यता तपासण्यासाठी सरकारकडून सीआयडी किंवा सीबीआय चौकशी केली जाते.
१. मुख्य तपास कोण करतं?
विमान अपघाताचा तांत्रिक तपास करण्यासाठी भारतात AAIB हीच सर्वोच्च संस्था आहे. AAIB ही नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक स्वतंत्र संस्था आहे. महत्त्वाचे म्हणजे, AAIB ही DGCA पासून स्वायत्त आहे. DGCA हवाई वाहतुकीचे नियम बनवण्याचे काम करते. तर DGCA च्या नियमात किंवा अंमलबजावणीत काही त्रुटी असतील, तर त्या निष्पक्षपणे समोर याव्यात, यासाठी AAIB काम करते. या तपासाचा मुख्य उद्देश कोणाला शिक्षा करणे हा नसून अपघाताचे मूळ तांत्रिक कारण शोधणे आणि भविष्यात असे अपघात टाळणे हा असतो.
२. DGCA चे काम काय असते?
अनेकदा असा समज होतो की DGCA चौकशी करते, पण तसे नाही. DGCA ही 'कंट्रोलर' सारखी असते. त्यांनी विमानाला उड्डाणाचे परवाने दिले होते का? वैमानिकाचे लायसन्स आणि मेडिकल अपडेटेड होते का? हे पाहणे त्यांचे काम असते. अपघाताच्या ठिकाणी प्राथमिक पुरावे गोळा करण्यासाठी आणि AAIB ला तांत्रिक माहिती पुरवण्यासाठी DGCA चे अधिकारी मदत करतात. जर AAIB च्या अहवालात विमान कंपनी किंवा वैमानिकाची चूक आढळली, तर त्यांचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई DGCA करते.
३. CID किंवा CBI चौकशी का आणि कधी होते?
विमान अपघात हा केवळ 'तांत्रिक बिघाड' नसून तो मानवी चूक किंवा घातपात असू शकतो, अशी शंका असल्यास पोलीस यंत्रणा यात उतरते. अजित पवार प्रकरणात महाराष्ट्र सरकारने हा तपास CID कडे सोपवला आहे.
वैमानिकावर कोणाचा दबाव होता का?
विमानात स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू होत्या का?
ग्राउंड स्टाफ किंवा मेंटेनन्स स्टाफपैकी कोणी जाणीवपूर्वक विमानाशी छेडछाड केली होती का?
हे सर्व इंडियन पीनल कोड किंवा भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हेगारी कृत्य होते का? याची चौकशी केली जाते.
४. विमान अपघाताची चौकशी नेमकी कशी चालते?
ही एक अत्यंत शास्त्रीय प्रक्रिया आहे. यात मुख्यत्वे ३ टप्पे असतात:
पहिला टप्पा असतो तो ब्लॅक बॉक्स आणि साइट इन्व्हेस्टिगेशन
अपघात स्थळावरून सर्वात आधी 'ब्लॅक बॉक्स' शोधला जातो. यात एफडीआर आणि सीव्हीआर अशी दोन मुख्य उपकरणे असतात. विमानाचा वेग, उंची, इंजिनचे तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल अशी शेकडो तांत्रिक माहिती एफडीआरमध्ये सेकंदा-सेकंदाला रेकॉर्ड होते. तर शेवटच्या क्षणी कॉकपिटमध्ये वैमानिक एकमेकांशी काय बोलले? ATC शी काय संवाद झाला? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे - धोक्याचे अलार्म किंवा स्फोटाचा आवाज काॅल व्हाॅईस रेकाॅर्डरमध्ये रेकॉर्ड होतो.AAIB, CID चौकशी आणि अपघात तपासाचा संपूर्ण प्रोटोकॉल
दुसरा टप्पा असतो प्रयोगशाळेतील तपास….
ब्लॅक बॉक्समधील डेटा डिकोड केला जातो. विमानाचे उरलेसुरले, अर्धवट जळालेले अवशेष गोळा करून ते प्रयोगशाळेत जोडले जातात. इंजिन अचानक बंद पडले की त्यात आग लागली होती, हे धातूच्या वितळण्याच्या पद्धतीवरून तपासले जाते.
तिसरा टप्पा असतो तो अहवालाचा…
प्राथमिक अहवाल साधारणपणे १ ते दीड महिन्यात येतो. यात नेमकं काय घडले, हे सांगितले जाते.
अंतिम अहवाल मिळण्यासाठी १०-१२ महिने लागू शकतात. यात का घडले आणि दोष कोणाचा? याचे सविस्तर विश्लेषण असते.
अजित पवार दुर्घटना प्रकरणात दिल्लीतील AAIB च्या लॅबमध्ये ब्लॅक बाॅक्स पाठवण्यात आले आहेत. तिथे त्यातील डेटा डिकोड करण्याचे काम सुरू आहे. यातून नेमकी काय माहिती हाती येते, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.