मुंबई पुढारी ऑनलाईन :
मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा सध्या महाविकास आघाडीत नसून उध्दव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सध्या देशात प्रचंड महागाई वाढली आहे. याची झळ ही सर्वसामान्य जनतेला बसत आहे; मग २०१६ मध्ये नोटाबंदी करून मोदी सरकारने नेमकं काय साध्य केले, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
यावेळी वळसे-पाटील म्हणाले की, २०१६ मध्ये केंद्र सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि भष्टाचाराला आळा घालण्यासाठी नोटाबंदी केली; पण देशातील महागाई मात्र सातत्याने वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारचं धोरण चुकलं आहे. नोटाबंदीने नेमकं काय साध्य केलं, यासंदर्भात केंद्र सरकारने जनतेला स्पष्टीकरण द्यावं, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे यांनी व्यक्त केले आहे.