Devendra Fadnavis On Narhari Zirwal: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयावरील छापा प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज बोलताना त्यांनी जरी माझ्या कार्यालयात सुद्धा कुणी असे पैसे मागितले तर छापा टाकून कारवाई होणारच असं ठणकावून सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना हे वक्तव्य केलं.
मंत्रालयात छापेमारी ही मुख्यमंत्र्याच्या आदेशाशिवाय होणार नाही अशी टीका राज्यातील विरोध करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आज विधानसभेत बोलताना उत्तर दिलं. ते राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना म्हणाले की, 'एक विषय एसीबीच्या बाबतीत देखील आला आहे. आपण त्या बाबतीत झिरो टॉलरन्स भूमिका अवलंबली आहे. सर्वात जास्त एसीबीचे छापे हे महाराष्ट्रात पडतात. हे सुरूच राहणार आहे कारण तक्रार आली की त्याची पडताळणी करायची आणि कारवाई करायची.'
फडणवीस पुढे म्हणाले, मंत्र्याला अधिकार आहेत की नाही, मंत्र्याच्या कार्यालयावर कशी छापेमारी करता माझ्या कार्यालयातील व्यक्ती जरी तक्रार आली तरी त्याच्यावर कारवाई होणार. मला न विचारता देखील एसीबी माझ्या कार्यालयात जाऊन कारवाई करू शकते. एसीबीला तो अधिकार आहे तो अधिकार आम्ही एसीबीला दिलेला आहे.'
फडणवीस यांनी सांगितलं की एसीबी हे राज्यातील स्वतंत्र युनिट आहे. त्यांच्याकडे तक्रार आल्यानंतर त्यांच्या चौकशीच्या पद्धती आहेत. त्या पद्धतीत त्यांना प्राथमिक तथ्य आढळलं तर ते सापळा रचतात. हा सापळा रचताना त्यांना कुठल्या मंत्र्याची गृहमंत्र्याची परवानगी घ्यावी लागत नाही.'
फडणवसी यांनी राज्यात गाजत असलेल्या टिपू सुल्तान फोटो प्रकरणी देखील उत्तर दिलं असून त्यांनी 'टिपू छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतका मोठा होता याला आमचा आक्षेप आहे. छत्रपतींच्या इतके गुणगान टिपूचं व्हावं याला आमचा आक्षेप. टिपू महान होते ते सांगितलं जातं पण 33 हजार हिंदूंची कत्तल करणारे तेच होते हे सांगितलं गेलं नाही. आता मात्र खरा इतिहास समोर येतोय. वर्षानुवर्षे तत्कालीन सरकारने मुगल साम्राज्याला 17 तर शिवरायांना एक पान दिलं. मोदी सरकारने एनसीआरटीच्या अभ्यासात 20 पाने शिवाजी महाराजांना दिली.' असं वक्तव्य केलं.