

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक लाच पकडल्यानंतर अन्न व घेताना औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही, याची काळजी घ्यावी तसेच प्रशासन आणि अधिकारी बदनाम होणार नाही याविषयी खबरदारी घ्या, अशा शब्दांत त्यांनी मंत्री झिरवाळ यांना समज दिल्याचे सांगितले जाते.
अन्न आणि औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. मंत्र्यांकडे असलेल्या अपील अर्जावर सकारात्मक निकाल देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.
एसीबीने केलेल्या कारवाईत ढेरिंगेच्या कार्यालयातून ४२ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली, तर त्याच्या नाशिकमधील घरावरही छापे टाकून सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. या घटनेमुळे प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी नाचक्की झाली.
या लाचखोरी प्रकरणाचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांतर्गत उमटले. यातच मंत्री झिरवाळ काही काळ नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी (दि. १६) मुंबईतील देवगिरी बंगल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक घेतली.
यात पवार यांनी झिरवाळ यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी मंत्री झिरवाळ यांना स्पष्ट शब्दांत सल्ला दिला. स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही याची सर्वस्वी काळजी घ्या.
प्रशासन आणि अधिकारी तुमच्या कारभारामुळे बदनाम होणार नाहीत, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशा कडक शब्दांत सुनेत्रा पवार यांनी झिरवाळ यांना समज दिली. यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही या मुद्द्यावरून झिरवाळ यांना धारेवर धरल्याचे समजते.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर आता मंत्री झिरवाळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत ते आपली बाजू मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.