भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील 208 लहान-मोठे नाले, जाफरी खाडी यंदाच्या पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करण्याच्या अनुषंगाने महापौर डिंपल मेहता यांनी सोमवारी, 23 मार्च रोजी पालिका व पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा आयोजित केला होता.
यापूर्वी पावसाळापूर्व नालेसफाईबाबत 18 मार्च रोजी महापौरांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात आढावा बैठक पार पडली होती. त्यात शहरातील रेल्वे समांतर नाले व इतर लहान, मोठे असे 208 नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणे सोमवारी महापौरांनी भाईंदर पूर्वेच्या रेल्वे स्थानकापासून ते फाटक रोड येथील पाण्याच्या टाकीपर्यंतच्या नाल्याची पाहणी केली. या नाल्यामध्ये जमा झालेली खडी, झाड्यांच्या फांद्या, पालापाचोळा, प्लास्टिक, माती, डेब्रिज पूर्णपणे काढून नाला स्वच्छ करण्याचे निर्देश महापौरांनी पालिकेला दिले. मात्र या नाल्याची साफसफाई करताना सफाई कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर महापौरांनी रेल्वे अधिकाऱ्यांना त्या नाल्याच्या ठिकाणी 5 द्वारे (गेट) नव्याने तयार करण्याचे निर्देश देत त्याचा प्रस्ताव पश्चिम रेल्वे प्रशासनाला पाठविण्याचे निर्देश पालिकेला दिले.
हा सुमारे 1 किमी अंतराचा नाला पूर्णपणे स्वच्छ केल्यास भाईंदर पूर्वेकडील रेल्वे समांतर केबिन रोड परिसरात पाणी साठण्याची समस्या निकाली निघून तेथील रहिवाशांना दिलासा मिळणार असल्याचे महापौरांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच दहिसर ते मीरारोड रेल्वे स्थानकादरम्यानच्या नाल्यासाठी आरसीसी बॉक्स पुशिंग पद्धतीच्या बांधकामाची आवश्यकता असल्याने त्या अनुषंगाने काम करण्याची सूचना त्यांनी पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना केली. तत्पूर्वी तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी बॉक्स तयार करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून पुढील पावसाळ्यापूर्वी कायमस्वरूपी आरसीसी बॉक्स पद्धतीचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार असल्याचे आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान त्या परिसरात साठणारा गाळ व मातीची नियमित साफसफाई करण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घ्यावी, अशी सूचना त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केली. तर चर्चगेट ते विरार दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम प्रगतीपथावर असून त्यासाठी.रेल्वे प्रशासनाकडून जाफरी खाडीत मोठ्याप्रमाणात मातीभराव केल्याने या खाडीतील पाण्याचा निचरा ठप्प झाला आहे. तो सुरळीत राहण्यासाठी लोहमार्गाखाली रेल्वेकडून टाकण्यात आलेले आरसीसी पाईप तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आले. असे न केल्यास खाडीतील पाणी परिसरात साठण्याची भीती महापौरांनी व्यक्त केली.
यामुळे रेल्वेने प्रशासनाने लोहमार्गाखाली टाकलेले आरसीसी पाईप काढून खाडीत जमा झालेली माती, गाळ पूर्णपणे साफ करण्याचे निर्देश विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंग यांना दिले. त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सिंग यांनी मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अधिकारी प्रेम सागर यांना दिले. या पाहणी दौऱ्यावेळी उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, शहर अभियंता दीपक खांबित, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, पश्चिम रेल्वेचे विभागीय अभियंता नमित जैन, नगरसेवक श्रीप्रकाश जिलेदार सिंह आदी उपस्थित होते.