राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत आले आहेत. मिटकरी यांनी भाजपवर नामांतराच्या मुद्यावरून जोरदार टीका केली आहे. भाजपने शहरांच्या नामांतरावरून कोणालाही वेठीस धरू नये. शहरांची नाव बदलल्याने विकास होत नसतो, तर तेथील लोकांचा विकास महत्त्वाचा असतो, असे मिटकरी यांनी म्हटले. (Amol Mitkari)
मिटकरी हे उस्मानाबाद दौऱ्यावर होते, त्यावेळी धाराशिव-उस्मानाबाद नामांतरासंदर्भात त्यांनी भाष्य केले. उत्तर प्रदेशातील कित्येक शहरे अशी आहेत, ज्यांची नावे इस्लामी पद्धतीच्या राजवटीची आहेत, त्या शहरांची नावे तुम्ही बदलून दाखवा, असे आव्हानच मी चंद्रकांत पाटील यांना दिले होते.
शहरांची नावे बदलल्याने विकास होत नसतो, लोकांचा विकास महत्वाचा आहे. औरंगाबादच्या नामांतराचा विषय महत्वाचा आहे, पण नाव संभाजी महाराजांचे द्यायचं आणि तेथे पुन्हा विकास नसणे, कचऱ्याचे प्रश्न उद्भवणे हे औरंगाबादकरांना भेडसावत आहेत, असे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारने औरंगाबादच्या विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे केले. लवकरच, शासन त्यावर निर्णय घेईल. आता, राहिला प्रश्न उस्मानाबाद जिल्ह्याचा, धाराशिव नावाची मागणी असली तर आजही भाजपा नेत्यांच्या लेटरपॅडवर उस्मानाबाद असेच लिहिलेले आहे.
त्यामुळे, जे या नाव बदलाची मागणी करतात, राज्य सरकारला वेठीस धरतात. मग, गुजरातमधील सर्वात मोठे शहर असलेल्या अहमदाबादचे नाव पंतप्रधान मोदींनी बदलून दाखवावे असे आव्हानच अमोल मिटकरी यांनी दिले आहे.