मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघाताची यंत्रणांमार्फत चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण होण्याआधीच तर्कवितर्क मांडल्याने जनतेत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणीही अजित पवारांच्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करू नये, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले. तसेच, भारतीय तपास यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह लावणे योग्य नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शंका व्यक्त करत आंतराष्ट्रीय संस्थांमार्फत चौकशीची मागणी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, रोहित पवार यांनी काय वक्तव्य केले, हे मी पूर्ण ऐकले नाही. अजित पवार हे महाराष्ट्राचे लाडके व वरिष्ठ नेतृत्व होते. त्यामुळे त्यांच्या अपघाताची सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, ही मागणी रास्त आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मी स्वतः सर्वात आधी केंद्र सरकारला पत्र लिहून योग्य चौकशीची मागणी केली होती. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी समिती स्थापन केल्याचे पत्रही पाठवले असून सध्या तपास सुरू आहे. त्यांच्या अपघाती निधनाचे सत्य बाहेर यावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे. कोणाकडे काही मुद्दे किंवा शंका असतील, तर त्यांनी ते डीजी सेफ्टीकडे पाठवावेत. शंका व्यक्त करणे चुकीचे नाही; मात्र त्याचा राजकीय हेतूने वापर होऊ नये, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भारताच्या तपास यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून अनेक देशांकडून भारतीय अधिकाऱ्यांना चौकशीसाठी निमंत्रित केले जाते. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याचे कारण नाही. भावनेच्या भरात काही विधाने झाली असतील; मात्र देशाच्या यंत्रणांवर शंका घेऊ नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.