

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला घातपात झाल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपापाठोपाठ आता या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिचे वडील शिवकुमार यांनीसुद्धा हा घातपातच असल्याचा गंभीर आरोप केला आहे. इतकेच नाही, तर पिंकीला आदल्या रात्री काहीतरी सांगायचे होते, असे बोलत त्यांनी घातपाताचा संशय गडद केला आहे. त्याचबरोबर त्यांनी अजित पवार यांचे प्रत्येकवेळी काळ्या रंगाचे विमान असायचे. मात्र, यावेळी अचानक विमान बदलून पांढरे विमान का आणण्यात आले? असा गंभीर सवालही उपस्थित केला.
शिवकुमार माळी यांनी उपस्थित केलेले प्रश्न
1) पिंकीने आतापर्यंत चारवेळा अजित पवार यांच्यासोबत काळ्या आणि करड्या रंगाच्या विमानातून प्रवास केला होता. अपघाताच्या दिवशी मात्र पांढर्या रंगाचे विमान का दिले गेले?
2) अजित पवार यांच्या विमानाचा पायलट ऐनवेळी का बदलण्यात आला?
3) सकाळी 6 वाजता मुंबईतील कोणत्या भागामध्ये ट्रॅफिक असते?
4) विमान अपघाताच्या दिवशी फक्त पायलटच नाही, तर विमानही का बदलले गेले?
5) भारतात बंदी असणारे विमान का पाठविले?
6) अपघातात मृत्यू पावलेल्या पायलटचा 50 कोटी रुपयांचा विमा का काढण्यात आला होता?
अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघाताची यंत्रणांमार्फत चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण होण्याआधीच तर्कवितर्क मांडल्याने जनतेत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणीही अजित पवारांच्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. तसेच, भारतीय तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह लावणे योग्य नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. आमदार रोहित पवार यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते तपास यंत्रणांकडे द्यावेत, असे फडणवीस म्हणाले.