वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर माजी आमदार शिवाजी चोथे यांनी शिंदे गट आणि भाजपचा जाहीर निषेध नोंदवला आहे. आपण आज सर्वजण कोजागिरी साजरी करणार आहोत. पण शिंदे गटाने दुधामध्ये मिठाचा खडा टाकून महाराष्ट्र आणि शिवसेनेचे दूध नासवलं, अशी टीका फेसबुक पोस्टद्वारे माजी आमदार शिवाजी चोथे यांनी केली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शिवाजी चोथे यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाना साधला.
ज्या बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली रुजवली आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना मानाचं पान आणि ओळख निर्माण करून दिली. त्या शिवसेनेवर आणि मातोश्रीवर तुम्ही सूड उगवत आहात. तुम्हाला जनता जनार्दन आणि परमेश्वर कधी माफ करणार नाहीत, असेही चोथे यावेळी म्हणाले.
दहा पिढ्यांचे पैसे कमवून तुम्ही शिवसेना संपवायला निघालात. तुम्हाला महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही, तुम्ही आमचे चिन्ह गोठवलं; पण आमच्या रक्त मात्र तुम्ही पेटवल हे लक्षात असू द्या. घामाच पाणी आणि रक्ताचा सडा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही मिसळू पण पुन्हा एकदा जोमाने उद्धव साहेबांच्या नेतृत्वात सत्ता काबीज करून दाखवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.