जिंतूर, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील मोजे पुंगळा तांडा येथील दोन विद्यार्थी पोहोण्यासाठी तलावात गेले असता पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.६) सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली. गोविंद संजू राठोड (वय९, इयत्ता ३ री), युवराज कृष्णा चव्हाण (वय ११, इ. ५ वी) अशी मृत मुलांची नावे आहेत.
पुंगळा गावापासून उत्तर दिशेला पुंगळा तांडा असून तांड्याच्या बाजूलाच एक छोटासा लघु सिंचन तलाव आहे. या तलावावर पोहण्यासाठी चार-पाच विद्यार्थी गेले होते. सायकल, बूट, चप्पल, कपडे काढून दुपारी चारच्या सुमारास पोहत असताना अचानक दोन विद्यार्थी पाण्यात बुडाले. त्यानंतर इतर मुलांनी घरी जाऊन त्यांच्या पालकांना ही माहिती दिली.
पालक व नागरिकांनी तलावावर मोठी गर्दी केली होती. शोध घेतला असता दोन्ही मुले तलावात मृत अवस्थेत दिसून आले. या घटनेमुळे तांडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांनी मुलांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले.
हेही वाचा