MSRTC summer fare hike 10 percent
जिंतूर : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह हा मोठ्या शहरांवर अवलंबून आहे. पुणे, मुंबई, नाशिक आणि संभाजीनगर यांसारख्या शहरांत मजुरी अथवा नोकरीसाठी गेलेले अनेक कामगार, कर्मचारी व लहान उत्पन्न गटातील नागरिक सुट्ट्यांच्या काळात आपल्या गावी परत येतात. मात्र, याच काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कडून करण्यात आलेली हंगामी तिकीट दरवाढ त्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये भर टाकणारी ठरत आहे.
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने यावर्षी सुमारे १० टक्के तिकीट दरवाढ लागू केली असून ही वाढ १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत लागू आहे. याशिवाय प्रत्येक तिकिटावर २ रुपयांचा स्वच्छता अधिभार आकारला जात आहे.ही वाढ तात्पुरती असली तरी तिचा फटका मात्र थेट सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर बसत आहे.
खेड्यापाड्यातील गोरगरीब कुटुंबातील सदस्य वर्षभर कष्ट करून शहरात काही पैसे साठवतात आणि सुट्टीच्या काळात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गावाकडे येतात. पण वाढीव भाड्यामुळे त्यांचा प्रवासच महाग झाला आहे. एकट्या व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचा प्रवास करताना ही वाढ मोठ्या आर्थिक ओझ्यात रूपांतरित होते.
परिणामी, अनेकांना आपल्या गावी येण्याचा निर्णयही पुढे ढकलावा लागत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, "बहुजन हिताय, बहुजन सुखाय" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या एसटी महामंडळाकडूनच अशा प्रकारे दरवाढ करून सामान्य जनतेवर आर्थिक भार टाकला जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सणासुदीच्या काळात - विशेषतः दिवाळी व उन्हाळी सुट्टयांमध्ये दरवाढीची परंपरा सुरू ठेवून महामंडळ जणू "अल्पजन सुखाय, बहुजन दुखाय" असे धोरण राबवत असल्याची टीका प्रवासी वर्गातून होत आहे. दरवाढीबरोबरच बसमधील
स्वच्छतेच्या प्रश्नावरही प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. अनेक बसमध्ये अस्वच्छता, खिडक्यांच्या बाजूला साचलेली घाण, गुटखा तंबाखूचे डाग, अन्नाचे अवशेष असे चित्र दिसते. अशा परिस्थितीत प्रवाशांकडून स्वच्छता अधिभार वसूल करणे म्हणजे अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, शाळा-महाविद्यालयांना सुट्टया लागल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, कुटुंबांसह प्रवास करणारे नागरिक, तसेच तीर्थयात्रा व पर्यटनासाठी जाणारे लोक यांची संख्या वाढलेली आहे. अशा वेळी दरवाढ लागू केल्याने आनंदावर पाणी फिरल्याचे दिसून येते.
सदरील भाडे वाढ ही मनमानी पद्धतीने वाढ केली असून प्रवाशावर अन्याय करणारी आहे .वाढ करत असताना प्रवाशांचा विचार करून करायला पाहिजे एक-दोन टक्के सहाजिक आहे .परंतु एकदम दहा टक्के भाडे वाढ करणे. हे ग्राहकावर मनमानी केल्यासारखे आहे. भाडेवाढ केली ही भाडेवाढ सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही.
सदरील भाडे वाढ रद्द करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे जिंतूरचे तहसीलदार याचा मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे तालुका अध्यक्ष मंचक जगताप देशमुख,उपाध्यक्ष भागवत चव्हाण, सचिव सचिन रायपत्रीवार यांच्या स्वाक्षरी आहेत.