गंगाखेड; प्रमोद साळवे : येथील नगर पालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम यांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश शुक्रवारी (दि.१३) रात्री उशिरा धडकले. नगर विकास मंत्रालयाने केलेली ही मुदतपूर्व बदली खरोखरच प्रशासकीय आहे की यामागे मोठे राजकारण आहे याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा नगरविकास मंत्रालयाचे अवर सचिव अ.का.लक्कस यांच्या स्वाक्षरीने मुख्याधिकारी तुकाराम कदम यांच्या बदलीचे आदेश धडकले. प्रशासकीय कारणास्तव ही बदली झाल्याचे लेखी आदेश आहेत. परंतू अचानकपणे मुदतपूर्व झालेल्या या बदलीने शहरात विविध चर्चेच्या वावड्या उठल्या आहेत.
शहरविकासासाठी आलेला कोट्यवधींचा विकासनिधी, सिओ कदम यांची अनेक राजकारण्यांना खटकलेली कार्यपद्धती, संत जनाबाई उद्यान पाडून त्याठिकाणी भक्त निवास बांधण्याची सुरू झालेली प्रक्रिया व यासंदर्भाने खासदार, माजी आमदार व माजी नगराध्यक्षांनी घेतलेला अमरण उपोषणाचा पवित्रा, पालिकेतील पाच सफाई कामगारांना नियमबाह्य दिलेल्या बढत्यांचे आरोप व याप्रकरणी झालेले अमरण उपोषण, नवीन रुजू झालेले अभियंता व मुख्याधिकाऱ्यात झालेली जोरदार खडाजंगी याशिवाय सरकारमधील एक बडा नेता तर बदलीमागचे सूत्रधार नाहीत ना याचीही जोरदार चर्चा उठली आहे. तुकाराम कदम यांच्या झालेल्या मुदतपूर्व बदलीस मॅटमध्ये आव्हान मिळणार काय? कदमांची बदली रोखण्यासाठी समर्थक यंत्रणा पुढे सरसावणार काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे काहीच दिवसात मिळतील अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, मुख्याधिकारी तुकाराम कदम यांची परभणी महानगरपालिकेत उपायुक्त सहाय्यक उपायुक्त पदी बदली झाली आहे तर पालिकेचे नवे मुख्याधिकारी म्हणून जिल्ह्यात मोठा प्रशासकीय अनुभव असलेले जयवंत सोनवणे हे जबाबदारी सांभाळणार आहेत.
हेही वाचा :