मानवत : शहरात चोरट्यांचा अक्षरशः हैदोस सुरू असून सलग दोन दिवसांत चोरीच्या दोन मोठ्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एक दिवसापूर्वी बसस्थानक परिसरातून ५० हजार रुपये लंपास झाल्याची घटना ताजी असतानाच आता भरदिवसा गजबजलेल्या बाजारपेठेतून १ लाख रुपयांची रोकड असलेली थैली चोरट्यांनी पळविल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव मस्के (रा. बोन्धरवाडी) यांच्या मुलीचे लग्न दि. १ तारखेला असल्याने दागिने खरेदीसाठी ते पत्नी व मुलीसह मानवत येथे आले होते. गोदू गल्ली परिसरातील राणी ज्वेलर्स येथे खरेदी करून परत जात असताना पत्नी व मुलगी पुढे पायी निघाल्या. दरम्यान, नामदेव मस्के यांनी सोबत असलेली वायरची थैली, ज्यामध्ये तब्बल १ लाख रुपये रोकड होती, ती दुचाकीच्या मागील बाजूस असलेल्या हुकाला अडकवली होती. ते पत्नी व मुलीकडे जात असताना त्रिमूर्ती कॉर्नर ते मारोती मंदिर या अवघ्या ५० मीटर परिसरात अज्ञात चोरट्यांनी क्षणार्धात थैली लंपास केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी शेख गाजीयोद्दिन, नारायण सोळंके व सुनील बावरी यांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील राणी ज्वेलर्स, काबरा दुकान व मानवत अर्बन बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र चोरट्यांचा माग काढण्यात यश आले की नाही, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
सलग दोन दिवसांत दोन चोरी; पोलिसांचा धाक संपला?
एक दिवसापूर्वी मानवत बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या खिशातील ५० हजार रुपये लंपास झाले. त्या घटनेचा तपास सुरू असतानाच दुसऱ्याच दिवशी शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत १ लाखांची थैली चोरीस जाणे, ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. शहरात सीसीटीव्ही, पोलीस गस्त, गुप्त माहिती जाळे असताना चोरटे इतक्या बिनधास्तपणे कारवाया करत असतील, तर पोलिसांचा धाक उरला आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
लग्नसराईत चोरट्यांची नजर नागरिकांवर
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात रोकड व दागिने घेऊन बाजारपेठेत येत आहेत. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी शहरात सक्रिय टोळ्या उभ्या केल्याची चर्चा सुरू आहे.
नागरिकांना इशारा
रोख रक्कम, दागिने किंवा मौल्यवान वस्तू वाहनावर उघडपणे ठेवू नयेत, गर्दीच्या भागात अधिक सतर्क राहावे, संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
कडक कारवाईची मागणी
मानवत शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर तातडीने लगाम घालून गस्त वाढवावी, व्यावसायिक भागात विशेष पथके तैनात करावीत आणि चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी व्यापारी व नागरिकांकडून होत आहे.