Maharashtra HSC SSC Exam 2026  (Pudhari Photo)
नांदेड

SSC HSC Exams | कॉपीमुक्त मोहिमेचा धडाका; दहावी-बारावी विद्यार्थ्यांची खरी कसोटी

नियमांचे काटेकोर पालन यामुळे विद्यार्थ्यांना पूर्ण तयारीनिशीच परीक्षेला सामोरे जावे लागत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Board Exam Rules

नायगाव : नायगाव तालुक्यात बारावीच्या लेखी परीक्षा शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्या तरी यंदाच्या कॉपीमुक्त अभियानाच्या कठोर अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांवर ताण वाढल्याचे दिसत आहे. परीक्षा केंद्रांवरील कडक शिस्त, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखरेख, भरारी पथकांच्या अचानक भेटी आणि नियमांचे काटेकोर पालन यामुळे विद्यार्थ्यांना पूर्ण तयारीनिशीच परीक्षेला सामोरे जावे लागत आहे.

प्रशासनाने यंदा पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त परीक्षा घेण्यावर विशेष भर दिला आहे. केंद्रांवर विद्यार्थ्यांची सखोल तपासणी केली जात असून मोबाईल, चिठ्ठ्या किंवा इतर कोणतेही साहित्य नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पर्यवेक्षकांची सतत नजर आणि नियमांचे पालन यामुळे विद्यार्थ्यांना केवळ स्वतःच्या अभ्यासावरच अवलंबून राहावे लागत आहे.

नियमित अभ्यासाचा अभाव ठरत आहे अडथळा

महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासात सातत्य ठेवले नसल्याचे चित्र परीक्षेदरम्यान स्पष्ट होत आहे. प्रश्नांचे आकलन, मुद्देसूद उत्तरे आठवणे आणि नेमकेपणाने मांडणी करणे यात अनेकांना अडचणी येत आहेत. परिणामी त्यांच्या कामगिरीवर परिणाम होत असल्याचे शिक्षकांचे निरीक्षण आहे.

वेळेचे नियोजन आणि लेखन कौशल्याची कमतरता

अनेक विद्यार्थ्यांना उत्तरे माहिती असूनही ती ठरलेल्या वेळेत स्पष्ट आणि मुद्देसूदपणे लिहिता येत नसल्याने काही प्रश्न अनुत्तरित राहत आहेत. वेळेचे योग्य नियोजन न झाल्यामुळे शेवटच्या प्रश्नांना वेळ न मिळणे, घाईगडबडीत अपूर्ण उत्तरे लिहिणे अशी स्थिती दिसून येत आहे. लेखनाचा पुरेसा सराव नसल्याची जाणीव यावेळी प्रकर्षाने होत आहे.

कडक देखरेखीमुळे वाढलेले दडपण

कॉपीमुक्त मोहिम प्रभावी करण्यासाठी केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, भरारी पथके आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांच्या मते, परीक्षा हॉलमध्ये इतकी कडक शिस्त आहे की साधी हालचाल करतानाही भीती वाटते. सततच्या देखरेखीमुळे तणावाखाली पेपर सोडवावा लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पेपरनंतर निराशेची भावना

परीक्षा संपल्यानंतर अनेक केंद्रांबाहेर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अपेक्षाभंगाचे भाव दिसून येत आहेत. पेपर अपेक्षेप्रमाणे न गेल्याची खंत, वेळ अपुरा पडल्याची भावना आणि तयारीतील उणिवा यामुळे काही जण चिंतेत दिसत आहेत.

शिक्षकांचा सल्ला

शिक्षकांच्या मते, कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देणारे आहे. नियमित अभ्यास, पाठ्यपुस्तकांचा सखोल सराव, उत्तरलेखनाचा सराव आणि शांत मनस्थिती राखल्यास उर्वरित पेपरांत चांगले यश मिळू शकते. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकंदरीत, यंदाची पारदर्शक आणि शिस्तबद्ध परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या खरी तयारी व क्षमतेची कसोटी ठरत असल्याचे नायगाव तालुक्यातील चित्र स्पष्ट करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT