Accident News File Photo
नांदेड

Nanded Accident | भरधाव क्रुझरची कावड यात्रेतील रिक्षाला जोरदार धडक; भाविकाचा जागीच मृत्यू, १४ जण जखमी

नागपूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उमरखेड शहरालगतच्या बायपास उड्डाणपुलावर अपघात

पुढारी वृत्तसेवा

Umarkhed Bypass Accident

उमरखेड, : नागपूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उमरखेड शहरालगतच्या बायपास उड्डाणपुलावर रविवारी ( दि. ६) रात्री साडेसातच्या सुमारास भीषण अपघात झाला. माहूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या क्रुझरने कावड यात्रेसोबत असलेल्या ऑटो रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कावड यात्रेतील विशाल दीपक पवार (३४, रा. नाग चौक, उमरखेड) यांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ भाविक जखमी झाले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

श्रीक्षेत्र उनकेश्वर येथून उमरखेडकडे जय श्री महाकाल कावड मंडळाच्या वतीने कावड यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत महिला, पुरुष आणि तरुणांसह सुमारे २० ते २५ भाविक सहभागी झाले होते. कावड यात्रा उमरखेडच्या दिशेने येत असताना माहूरकडून नांदेड-लोहाच्या दिशेने जाणाऱ्या क्रुझरने यात्रेसोबत असलेल्या ऑटोला मागून जोरदार धडक दिली.

धडक एवढी भीषण होती की ऑटोमधील तसेच कावड यात्रेतील भाविक गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये अविनाश मासाळकर (३३), विकी ससाने (२७), मयूर इंगोले (१२), संदीप जाधव (३८), ओम राजेश चवरे (२४), रोहिणी पडेवार (२०, रा. लोहा, जि. नांदेड), बाबू मानखुळकर (२८), शिवम गजानन भगाडे (१५), शुभम गजानन भगाडे (२०), तुषार राजू (२०), यशवंत भालेराव (१८), रवी जाधव (३०), आकाश ढोरे (१७) आणि तुनकेवाड (२०, रा. उमरखेड) यांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींपैकी काहींना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, तर सात ते आठ जखमींवर उमरखेडमध्ये उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी कावड यात्रेतील अनुराग गजानन कदम यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी क्रुझरचालक पीर मोहम्मद चांद शेख (रा. शिवणी जामगा, ता. लोहा, जि. नांदेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला लोहा येथून ताब्यात घेतले. क्रुझर (एमएच २६ ए.के. ७३८७) माहूरहून नांदेड-लोहाकडे जात असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अपघाताची वार्ता शहरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळ तसेच शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली. या अपघातामुळे उमरखेड शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बायपासवरील पथदिवे बंद असल्याचा आरोप

अपघातानंतर काही नागरिकांनी बायपासवरील बंद पथदिव्यांबाबत संताप व्यक्त केला. मागील अनेक दिवसांपासून या मार्गावरील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी परिसरात पुरेसा प्रकाश नसतो. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, संबंधित यंत्रणेने तातडीने पथदिवे सुरू करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT