

Naigaon Power Outage Problem
धर्माबाद : नायगाव फिडर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. किरकोळ पाऊस किंवा वारा आला तरी वीजपुरवठा खंडित होतो आणि त्यानंतर तासन्तास, प्रसंगी रात्रभर वीज पूर्ववत होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या समस्येमुळे विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दुकानदार व छोट्या व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नायगाव फिडरची तातडीने तांत्रिक पाहणी करून ट्रान्सफॉर्मर, विद्युत वाहिन्या, खांब व इतर यंत्रणेची दुरुस्ती व आवश्यक क्षमता वाढ करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता, धर्माबाद तसेच तहसीलदार, धर्माबाद यांना निवेदन देण्यात आले असून, समस्या तातडीने सोडवली नाही तर महावितरण कार्यालय, धर्माबाद येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा नायगाव फिडर अंतर्गत येणाऱ्या गावांतील नागरिकांनी दिला आहे.