

नांदेड : ऊस पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या ‘पायरीला’ (पानावरील तुडतुडा) या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी सतर्क राहून पिकाची नियमित पाहणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
पायरीला किडीची पिल्ले व प्रौढ कीटक पानातील रस शोषतात, ज्यामुळे पाने पिवळी पडतात. किडीमुळे तयार होणाऱ्या चिकट मधासारख्या पदार्थावर काळी बुरशी वाढल्याने प्रकाशसंश्लेषण बाधित होऊन उसाची वाढ खुंटते.
प्रादुर्भाव दिसताच रासायनिक नियंत्रणाची घाई न करता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा पानांच्या खालच्या बाजूस तपासावे.
किडीच्या निरीक्षणासाठी प्रति ५ एकर एक प्रकाश सापळा सायंकाळी ६ ते १० या वेळेत लावावा. प्रति पान ३ ते ५ पिल्ले किंवा प्रौढ अथवा १ अंडीपुंज आढळल्यास ती आर्थिक नुकसान पातळी मानून उपाययोजना कराव्यात.
जैविक शत्रू उपलब्ध नसतील आणि प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असल्यास क्लोरपायरीफॉस २०टक्के ईसी (१५०० मिली/हेक्टर) किंवा ॲसिफेट ५० टक्के + इमिडाक्लोप्रिड १.८० टक्के एसपी (२५०० ग्रॅम/हेक्टर) ५०० ते १००० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.