Shirur Anantpal Vijayawada Dhaba Fire New Twist
शिरूर अनंतपाळ : लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथील विजयवाडा ढाबा जाळल्याच्या घटनेला नवे वळण मिळाले आहे. धाबा चालक अनिल नरहरी टोपे (रा. नळेगाव) यांनी चाकूर येथील पोलीस उपअधीक्षकांकडे तक्रार अर्ज सादर करून काही व्यक्तींवर खंडणीची मागणी, जातीवाचक शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी, व्यवसायात अडथळा निर्माण करणे आणि धाब्याला आग लावून सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप केला आहे.
तक्रारीनुसार, शिवपूर येथील विजयवाडा ढाब्याचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी ५० हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. ही रक्कम न दिल्यास धाबा बंद करून जाळून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे. तसेच २७ जून रोजी जमावाने धाब्याची तोडफोड करून आग लावल्यामुळे फ्रिज, गॅस सिलेंडर, फर्निचर, किराणा माल, बँकेची कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दुसरीकडे, या घटनेबाबत शिवपूर ग्रामस्थांनी वेगळी भूमिका मांडली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित धाब्यावर कथितरित्या अवैध दारूची विक्री सुरू होती. याबाबत वारंवार पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करूनही प्रभावी कारवाई झाली नसल्याने संतप्त महिला व नागरिकांनी आंदोलनाच्या स्वरूपात धाब्याची तोडफोड करून आग लावल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, धाब्यावर अवैध दारूविक्री होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेला नसून, त्याबाबतचा तपास सुरू आहे.
धाबा मालकाने संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची, पोलीस संरक्षण देण्याची, नुकसानभरपाई मिळवून देण्याची तसेच अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात धाबा मालकाचे गंभीर आरोप आणि ग्रामस्थांची अवैध दारूविक्रीविरोधातील भूमिका अशा दोन्ही बाजू समोर आल्या आहेत. त्यामुळे या घटनेमागील वस्तुस्थिती पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.