

Pan stalls locked up, milk shortage, and panic among hotel owners following Tukaram Mundhe's crackdown in Chakur
संग्राम वाघमारे
चाकूर : चाकूर शहरांसह तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कारवाईची चाहूल लागताच पानपट्ट्यांना कुलूप लागले आहे. शेतकऱ्याच्या दुधाची टंचाई भासू लागली असून भेसळखोर व्यापाऱ्यांनी धास्ती खाल्ल्याचे चित्र दिसू लागले आहे.
आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट व निकृष्ट दजार्ची औषधे, प्रतिबंधित गुटखा तसेच ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांविरोधात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांकडून सातत्याने धाडसत्र राबविले जात असून त्या पथकाकडून भेसळयुक्त अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थ, औषधे आणि गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा बडगा उचलण्याची मोहीम सुरु झाल्याने लातूर जिल्ह्यात त्या चर्चेला ऊत आला असून चाकूर शहरात व तालुक्यात पानपट्ट्या चालकांनी कुलूपे लावले आहेत.
बेकरी व्यापारी, किराणा दुकान, मेडिकल, दूध डेअरी आदी व्यापाऱ्यांनी धास्ती खाल्ल्याची चर्चा सुरू आहे. चाकूर शहरातही या कारवाईची चर्चा चौका चौकात रंगली आहे. तर काहींनी सावध पवित्रा घेतला असून काही ठिकाणी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची उघड विक्री कमी झाल्याचे दिसून येत आहे.
अचानक धाडीच्या भीतीने अनेक गुटखा विक्रेते व अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी पानपट्ट्याच्या परिसरात थांबून बघ्याची भूमिका घेत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. दरम्यान, तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धाडसत्रांमुळे राज्यातील भेसळखोर व्यापारी, गुटखा विक्रेते आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये कारवाईची भीती निर्माण झाली असून भविष्यात भेसळखोरांवर कारवाई होण्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
अन्न व औषध प्रशासन क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाच्या या कारवायांचा परिणाम आता शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत दिसून येत आहे. आयुक्त तुकाराम मुंडे आणि प्रशासनाने उचललेली कठोर पाऊले याचे सामान्य नागरिकांकडून स्वागत होत आहे.
शेतकऱ्यांचे दुध एरव्ही मनावे तसे विक्री होत नव्हते. तुकाराम मुंडे यांची अन्न व औषध प्रशासनातील एंट्री आणि धाडस्या कारवाईमुळे राज्यभर एकच चर्चा सुरू झाली. ग्रामीण भागात त्याचे पडसाद उमटले, पॉकेटात येणाऱ्या दुधाकडे नागरिकांचा कल कमी झाल्याचे दिसत असून शेतकऱ्यांचे दूध डेअरीवर मिळणे कठीण झाल्याचे पहायला मिळत आहे.