Fertilizer price hike 
जालना

Fertilizer price hike: खतांच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना दुहेरी फटका; मिरचीला भाव नाही, उत्पादन खर्च वाढला...

खतांचे दर वाढले, पावसाची अनिश्चितता आणि मिरचीला कमी भाव” अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे

पुढारी वृत्तसेवा

सागर देशमुख

पारध : एकीकडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत असताना दुसरीकडे खतांच्या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात यंदा मिरची, सोयाबीन, मका आणि कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना खतांची मोठी गरज असतानाच खतांच्या दरात झालेली वाढ त्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम करणारी ठरत आहे.

मे महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये अनेक खतांच्या दरात वाढ झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 20:20:13 खताचा दर मे महिन्यात सुमारे 1,500 रुपये होता, तो ऑगस्टमध्ये 2,250 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 18:18:10 खताचा दर 1,300 रुपयांवरून 1,450 रुपये, तर 10:26:26 खताचा दर 1,650 रुपयांवरून 2,150 रुपये झाला आहे. DAPचा दर 1,350 रुपयांवरून 1,450 रुपये, तर 15:15:15 खताचा दर 1,550 रुपयांवरून 1,950 रुपयांपर्यंत वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

युरियाबाबतही शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. युरियाचा हमीभाव 266 रुपये असताना काही ठिकाणी तो 350 ते 400 रुपयांना विकला जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे शासनाने खतांच्या दरावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना योग्य दरात खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, खतांचे दर वाढत असतानाच पारध परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावाचा मोठा फटका बसत आहे. चांगल्या दर्जाच्या मिरचीला सध्या बाजारात केवळ 20 ते 22 रुपये किलो, तर मध्यम दर्जाच्या मिरचीला 17 ते 18 रुपये किलो दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.

“खतांचे दर वाढले, पावसाची अनिश्चितता आणि मिरचीला कमी भाव” अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. एकीकडे शेतीचा उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाने खतांचे दर नियंत्रणात आणून मिरचीसह इतर शेतमालाला योग्य भाव मिळवून द्यावा, अशी मागणी पारध परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

शेतकरी अरुण काटोले म्हणाले, “यंदा पाऊस कमी असल्याने शेतकरी आधीच अडचणीत आहे. मिरची, सोयाबीन, मका आणि कपाशीच्या पिकासाठी खतांची गरज मोठी आहे; मात्र खतांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यात मिरचीला अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नाही. युरियाचा हमीभाव 266 रुपये असताना तो 350 ते 400 रुपयांना घ्यावा लागत असल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. शासनाने खतांचे दर नियंत्रणात आणून शेतकऱ्यांना योग्य दरात खते उपलब्ध करून द्यावीत आणि मिरचीला योग्य भाव मिळवून द्यावा.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT