छत्रपती संभाजीनगर : शहर जिल्ह्यासह मराठवाड्यातील बॅंकांमध्ये रोख रकमेचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, बॅंकांमधून रोख रक्कम काढण्यावर मर्यादा आल्या आहेत. एटीएममध्येही खडखडाट आहे.
ऐन लग्नसराई आणि मान्सूनपूर्व शेत मशागतीच्या काळात शेतकरी, नागरिकांसह असंख्य खातेदारांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेकडून चेस्ट करन्सी बॅंकांना मागणीच्या तुलनेत अवघ्ये 30 टक्केच रक्कम मिळत असल्याने या अडचणी निर्माण झाल्याचे वरिष्ठ बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले.
मराठवाड्यात सर्वच सध्या लग्नसराईचा धूमधडाका सुरू असल्याने कपडे, दागिने, फर्निचरसह विविध वस्तू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात रोख रकमेची आवश्यकता असते. मात्र, खात्यात पैसे असूनही बॅंकाकडून पैसे मिळत नाहीत.
ऑनलाईन खरेदी करा, डिजिटल व्यवहार करा असे सांगितले जात आहे. अनेक एटीएममध्येही खडखडाट आहे. प्रत्येक जिल्ह्यातील चेस्ट करन्सी बॅंकांना मागणीच्या तुलनेत अवघी तीस टक्केच रक्कम पुरवठा होत आहे
दरम्यान, बॅंकामधून पैसे मिळत नसल्याने अनेक वधू-वर पक्षांची आर्थिक ओढाताण सुरू आहे. असंख्य खातेदारही याच संकटामुळे आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दुसरीकडे मान्सूनपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामे सुरू असल्याने बी-बियाणे आणि खते खरेदीसाठीही शेतकऱ्यांना रोख रकमेची गरज पडते. मात्र, बॅंकांनी रोख रक्कम काढण्यावर मर्यादा लादल्याने शेतकरीही हवालदिल झाले आहेत.
शेतकरी, मेडिकल साठी प्राधान्य, बँकांचा दावा
मागील दीड ते दोन महिन्यांपासून आरबीआयकडून प्रत्येक जिल्ह्यातील करन्सी चेस्ट बॅंकांना अवघ्या 30 टक्केच रक्कम पुरवठा होत आहे. यामुळे निर्माण झालेल्या अडचणी संदर्भात वरिष्ठ पातळीवर आणि आरबीआय बॅंकेला कळविल्याचे बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले. रोख रकमेचा पुरवठा सुरळीत होण्यास आणखी 15 दिवस लागू शकतील, असेही या अधिकाऱ्यांनी नमूद केले.