बीड

Beed crime : बीड जिल्ह्यात खुनाचे धाडसत्र थांबता थांबेना, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे भर चौकात युवकाची निर्घृण हत्या

तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाला संपवले

पुढारी वृत्तसेवा

गोविंद खरटमोल

अंबाजोगाई : बीड जिल्ह्याला झाले तरी काय एका महिन्यात दोन ते तीन जणांची हत्या होतच आहे. जिल्ह्यातील नागरिकांना विशेषतः तरुणाईला कायद्याची भीतीच उरली नाही की काय अशीच संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतुन व्यक्त होतांना आढळून येते आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील अण्णाभाऊ साठे चौकात शनिवारी (दि.११) रात्री एका तेवीस वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्यारे आणि दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. ज्ञानेश्वर वाकडे (वय २३, रा. पट्टीवडगाव) असे या मृत तरुणाचे नाव असून या जीवघेण्या हल्ल्यात त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. हत्या करण्यात आलेला युवक हा स्वयंपाक करण्याचे काम करणारा आचारी असल्याची माहिती मिळत आहे. भररस्त्यात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्ञानेश्वर वाकडे हा शनिवारी रात्री स्वयंपाकाचे काम करून आपल्या एका मित्रासोबत दुचाकीवरून घाटनांदूर येथून पट्टीवडगाव या आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाला होता. हे दोघे अण्णाभाऊ साठे चौकात आले असता काही जणांनी त्यांची दुचाकी अचानक अडवली. काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी ज्ञानेश्वर आणि त्याच्या मित्रावर तीक्ष्ण हत्यारे, दगड आणि विटांनी अमानुष हल्ला चढवला. या भयंकर मारहाणीत रक्ताच्या थारोळ्यात पडून ज्ञानेश्वरचा मृत्यू झाला. या झटापटीत त्याच्यासोबत असलेला मित्र या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. हा जीवघेणा हल्ला कोणत्या कारणास्तव झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या या घटनेने सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील युवकांमध्ये पोलीस प्रशासनाचा तसेच कायद्याचा वचक राहिला नसल्याचे सर्वसामान्य नागरिकांतुन भावना व्यक्त केल्या जात आहेत.पोलिस प्रशासनाकडून देखील एखादी घटना घडल्यानंतर त्यावर कठोर अशी पावले उचलल्याचे अभावानेच दिसून येते. त्यामुळे देखील तरुणांच्या या गुंड प्रवृत्तीला खतपाणी मिळत असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे.

या भीषण घटनेनंतर मयत ज्ञानेश्वरचे संतप्त आणि दुःखी नातेवाईक तक्रार देण्यासाठी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात बसून आहेत. मात्र अद्याप या प्रकरणी अधिकृतपणे गुन्हा दाखल झालेला नसून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस गुन्हा नोंद करण्यास विलंब करत असल्याचे मयताच्या नातेवाईक मंडळी कडुन भावना व्यक्त केली जात आहे. यातूनच पुन्हा अशा घटनांना जातीय तथा राजकीय रंग दिल्याने पुन्हा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत आहे. यामुळेच पोलीस प्रशासनाने वेळीच पाऊले उचलून घटनेचा सखोल तपास करून आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याची मागणी देखील पुढे येऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT