मराठवाडा

औरंगाबाद अन् जर्मनीतील इंगोलस्टॅट शहरामध्ये करार

अमृता चौगुले

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद शहर आणि जर्मनी मधील इंगोलस्टॅट शहरामध्ये ट्वीन सिटी अग्रीमेंट करण्यात आले आहे. शुक्रवारी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. औरंगाबादकडून मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय आणि इंगोलस्टॅटचे महापौर डॉ. ख्रिस्तियन श्राफ यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या करारामुळे औरंगाबाद आणि इंगोलस्टॅट मध्ये शिक्षण, संस्कृती, आरोग्य, क्रीडा, उद्योग, पर्यटन, कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात भागिदारीच्या संधी निर्माण होतील. शहरांमध्ये स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्राम, औद्योगिक भागीदारी, पर्यटन यांना चालना मिळेल. जोपर्यंत दोन्ही शहरांचा प्रतिसाद मिळत राहील, तोपर्यंत हा करार अबाधित राहील, या करारामुळे औरंगाबाद आणि इंगोलस्टॅटचे संबंध वृध्दिंगत होणार असून भारत आणि जर्मनी, महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्या संबंधांवर देखील याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असा विश्वास अस्तिक कुमार पाण्डेय यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात इंगोलस्टॅटचे महापौर डॉ ख्रिस्तियन श्राफ, उपमहापौर डॉ. दोरोथे डेनेके, इंगोलस्टॅटचे शिक्षण आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख गॅब्रीएल एंजर्ट, सांस्कृतिक विभागाच्या क्रिस्टिना दिएडरीच, आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या विभाग प्रमुख ब्रिगीट स्टॉकल, मेलानी कुनेल, म्युनिक जर्मनी साठी भारताचे कौन्सिल कौन्सिलेट जर्नल डॉ. सुयश चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, ऑरीकचे व्यवस्थापकीय संचालक रंगा नायक उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉ. सुयश चव्हाण यांनी या कराराबद्दल माहिती दिली. त्यानंतर इंगोलस्टॅटचे महापौर डॉ. ख्रिस्तियन श्राफ यांनी या भागीदारी बद्दल मत व्यक्त करत सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. त्यांच्या शहराबद्दल माहिती देत औरंगाबादसोबत शहरासोबत भागिदारी करण्यास प्रोत्साहन दिले. या करारामुळे दोन शहरातील शाळा, महाविद्यालये भागिदारी करुन स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्रॅम सारख्या संकल्पना राबवू शकतील. लवकरच यावर काम करू असे देखील ते यावेळी म्हणाले.

उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी या करारासाठी दोन्ही शहरांना शुभेच्छा देत हा करार शहरासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे सांगितले. या करारामुळे दोन्ही शहरांत संकल्पनांची देवाणघेवाण होईल, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढेल, शहराचा विकास होईल आणि नागरिकांना नव्या कल्पना आणि नवे अनुभव मिळतील असे ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी इंगोलस्टॅटच्या टीमला औरंगाबादला येण्याचे आमंत्रण देखील दिले.

हेही वाचा  

SCROLL FOR NEXT