Shahuwadi Crop Damage Compensation Issue Pudhari
कोल्हापूर

Shahuwadi Forest Department | विविध घटनांमुळे शाहूवाडी वनविभाग चर्चेत; नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्याने पिके कार्यालयासमोर टाकत नोंदवला निषेध

पिकांचे नुकसान, जंगलाला आग आणि बनावट वसुलीच्या प्रकारांनी तालुक्यात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Shahuwadi Crop Damage Compensation Issue

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील वनविभाग सध्या विविध घटनांमुळे चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाले असून नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून वनविभागाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच जंगलाला आग लावणाऱ्यांवरील कारवाई आणि वनविभागाच्या नावाने बनावट वसुली करणाऱ्या व्यक्तीचा प्रकार समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये रानडुक्कर, गवे आणि माकडांच्या वाढत्या वावरामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वारंवार तक्रारी करूनही वनविभागाकडून तातडीने उपाययोजना होत नसल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नुकसानभरपाई मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने थेट नुकसानग्रस्त पिके वनविभागाच्या कार्यालयासमोर आणून टाकत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. या आंदोलनात्मक प्रकाराची तालुकाभर चर्चा सुरू असून शेतकरी वर्गात तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

दुसरीकडे, जंगल परिसरात आग लावणाऱ्या काही संशयितांविरोधात वनविभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार लागणाऱ्या आगीमुळे वनसंपत्ती आणि वन्यजीवांना मोठा धोका निर्माण होत असल्याने संबंधितांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा इशाराही वनविभागाने दिला आहे.

याचदरम्यान, वनविभागाशी संबंध असल्याचे भासवून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयिताला सतर्क नागरिकांनी पकडून अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली असून वनविभागाने कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे.

वन्य प्राण्यांचा वाढता त्रास, नुकसानभरपाईचा प्रश्न आणि विविध घडामोडींमुळे शाहूवाडी तालुक्यातील वनविभाग सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शाहूवाडी तालुक्याच्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांसमोर शेतीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे वनविभाग आणि शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
- राजू वडाम, उखळू, (स्वाभिमानी शेतकरी संघटना)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT