पोलिस कर्मचारी Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : ठाण मांडलेल्या पोलिसांंची उचलबांगडी होणार का?

पुढारी वृत्तसेवा
सतीश सरीकर

कोल्हापूर : कोणीही पोलिस अधिकारी येऊ देत, ठराविक पोलिस कर्मचारी त्याच ठाण्यात किंवा विशेष शाखेत दिसणार. काही जणांची नियुक्ती एका ठिकाणी अन् प्रतिनियुक्तीवर दुसर्‍याच ठिकाणी. रिटायर्डमेंट आली तरी एका गुन्ह्याचाही तपास नाही. एवढेच काय, अनेक वर्षे काही जण चक्क गणवेश घालत नाहीत, अशीही उदाहरणे आहेत. वरिष्ठांची मर्जी असल्याने अशा पोलिसांनी वर्चस्व निर्माण केले आहे. साहजिकच, अशा ठाण मांडलेल्यांची उचलबांगडी होणार का? आणि सर्वसामान्य पोलिसांना न्याय मिळणार का? अशी चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

जिल्हा पोलिस दलात सुमारे 2 हजार 500 वर पोलिस अधिकारी व कर्मचारी आहेत. 31 ठाणी आणि एलसीबी, एलआयबी, एटीएस, महिला दक्षता पथकासह विविध शाखा आहेत. मलईदार शाखांमध्ये अनेक वर्षे चिकटून बसलेले खंडित, विखंडित सेवेंतर्गत बदलीस पात्र होणार का? नेमणुकीचे ठिकाण पाहण्यापेक्षा संबंधित पोलिस कर्मचार्‍यांनी प्रत्यक्षात कुठे काम केले ते पाहावे. वरिष्ठांचे बंगले ते मलईदार शाखा आणि पुन्हा मलईदार शाखा ते वरिष्ठांचे बंगले, असे फेरे मारणार्‍यांना बदली लागू होणार का? अशी चर्चा सुरू आहे.

692 पोलिस कर्मचारी बदलीस पात्र

नियमानुसार 31 मेपर्यंत पोलिस दलात बदल्या कराव्या लागतात. मात्र, लोकसभा निवडणूक, पोलिस भरती सुरू होती. त्यामुळे 30 जूनपर्यंत बदल्यांसाठी मुदत आहे. परिणामी, जिल्ह्यातील पोलिसांना बदल्यांचे वेध लागले आहेत. 692 पोलिस बदलीस पात्र आहेत. त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. एकाच ठिकाणी 5 वर्षे पूर्ण झालेले 492 व उपविभागात खंडित व अखंडित 12 वर्षे सेवा झालेले 200 कर्मचारी आहेत. संबंधितांना पाच चॉईस देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. एलसीबी, एलआयबी, एमटी, एटीएस, एएचटीयू, महिला दक्षता पथक, सायबर क्राईम, पासपोर्ट शाखा, रीडर ब—ँच आदीसह इतर विशेष शाखा आहेत. यातील काही शाखांना बंदोबस्ताचा ताण नाही. गुन्ह्यांचा तपास नाही. त्यामुळे बहुतांश अधिकारी, कर्मचार्‍यांची विशेष शाखांत नियुक्तीसाठी धडपड सुरू असते.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अर्थात एलसीबीमधील पोलिसांचा जिल्ह्यात दरारा असतो. इतर सर्व पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्या ठाणे किंवा कार्यक्षेत्रापुरते मर्यादित असतात. मात्र, एलसीबीला मोकळे रान असते. साहजिकच, प्रत्येक अधिकारी आणि कर्मचार्‍यांची एलसीबीच पहिली पसंती असते. जिल्ह्यात थेट कारवाईचे अधिकार या विभागाला आहेत. त्यामुळे गुन्हेगार आणि दोन नंबर धंदेवाल्यांवर थेट वचक असतो. त्यातच बीट पद्धतीने काम असल्याने कुणाचा कुणाच्या कामात हस्तक्षेपही नाही.

वरकमाईसाठी ‘ट्रॅफिक’

पोलिस दलांतर्गत कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखा कार्यरत आहेत. जिल्हा पोलिस दलातील कर्मचार्‍यांची या ठिकाणी नियुक्ती होते. वाहतूक नियंत्रण शाखा अर्थात ट्रॅफ्रिक ब्रँचमध्ये वर्णी लागावी यासाठी अनेकजण ‘फिल्डिंग’ लावतात. कारण, ट्रॅफिक म्हणजे वरकमाईचे ‘कुरण’ मानले जाते. काही पोलिस कर्मचारी या ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून आहेत.

हायवे पोलिससाठी 4 लाख दराची चर्चा

पुणे-बंगळूर महामार्गावरील उजळाईवाडी आणि आंबा घाट येथे असे दोन पॉईंट हायवे पोलिस (वाहतूक महामार्ग पोलिस) म्हणून आहेत. त्या ठिकाणी जिल्हा पोलिस दलातीलच कर्मचारी घेतले जातात. मात्र, त्यांची नियुक्ती थेट मुंबईतून होते. सद्यस्थितीत हायवे नियुक्तीसाठी 4 लाख दर निघाल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

अनेकांची पहिली पसंती

* जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा

* शहर वाहतूक नियंत्रण शाखा

* महामार्ग वाहतूक पोलिस

* एलआयबी

* महिला दक्षता समिती

* दहशतवादविरोधी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT